प्रतिनिधी/ रत्नागिरी
राजापूर तालुक्यातील ओणी तिसेवाडीत गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने भर वस्तीत मोठे भूस्खलन होऊन घरे खचली. अनेक वर्षे रहिवास असलेली घरे खचल्याने लोक बेघर झाले. त्याठिकाणी भविष्यात वास्तव्य करणे धोक्याचे असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथील ग्रामस्थांचे पुनर्वसन होणे गरजेचे होते. मात्र लोकप्रतिनिधी, प्रशासनस्तरावरून आश्वासना व्यतिरिक्त कोणतेही पूनर्वसन अद्यापपर्यंत झाले नसल्याने येथील ग्रामस्थ आजही प्रतिक्षेत आहेत.
ओणी तिसेवाडी येथे गेल्या 50 वर्षाहून अधिक काळापासून भारती, हातणकर या ग्रामस्थांची कुटुंबे वास्तव्यास आहेत. या भागात गतवर्षी अतिवृष्टीन भूस्खलन व जमिनीला मोठय़ा भेगा गेल्याने तेथील घरांचेही प्रचंड नुकसान झाले होते. घरे खचली व शेतीतही तडे जाऊन तो भाग धोकादायक झाला आहे. मोलमजूरी व शेतीवर उदरनिर्वाह करणाऱया या कुटुंबांना स्वकष्टाने बांधलेली घरे डोळय़ादेखत खचण्याच्या घटनेने मोठा धक्का बसला.
येथील आपदग्रस्त कुटुंब त्यानंतर शेजाऱयांच्या घरी वास्तव्यास गेली. हक्काची घरे जमीनदोस्त झाल्याने ती पुन्हा नव्याने कशी व कुठे उभारायची हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. या नुकसानीच्या पाहणीसाठी त्यावेळी विविध क्षेत्रातल्या व्यक्ती, अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. अत्यावश्यक मदत त्यावेळी करण्यात आली होती, असे नुकसानग्रस्त सुरेश भारती यांनी सांगितले. पण आम्हा कुटुंबियांच्या कायम स्वरूपी पुनर्वसनाबाबत प्रशासन स्तरावरून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. आता पुन्हा पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे या भागात वास्तव्य करणे धोकादायक झालेले आहे. त्याचा प्रशासनस्तरावरून कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गांभीर्यांने विचार करावा अशी मागणी सुरेश भारती यांनी केली आहे.