वेंगुर्ले / वार्ताहर-
केंद्र सरकारच्या अघोषित आणिबाणीच्या विरोधात आणि भाजपच्या करंटेपणामुळे ओबीसी समाजाचे जे आरक्षण रद्द झाले त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळे झेंडे दाखवून वेंगुर्ले तालुका काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. ‘केंद्र सरकारचा निषेध असो‘, ‘नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी‘ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
वेंगुर्ले तहसिल कार्यालयासमोर केलेल्या या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्राक्ते इर्शाद शेख, ओेबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, तालुका सरचिटणीस उत्तम चव्हाण, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, नगरसेवक दादा सोकटे, महिला शहर अध्यक्षा कृतिका कुबल यांच्यासह शुभम गावडे, अंकुश मलबारी, समिर नागवेकर, जुबेर जग्गुभाई, शरीफ शेख, अक्षय डोंगरे आदी उपस्थि होते.
राज्यघटनेने देशातील नागरिकांना आपले मत मांडण्याचा जो अधिकार दिला आहे त्यावर गदा आणण्याचे काम हे हुकुमशाही मोदी सरकार करीत आहे. या हुकुमशाही सरकारला उलथून टाकल्याशिवाय बहुजन समाजाला या देशात नाय मिळणार नाही. ओबीसी समाजाचे जे आरक्षण रद्द झाले आहे याला फक्त आणि फक्त भाजपच जबाबदार असल्याचे बोलताना इर्शाद शेख यांनी सांगितले.