ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात आतापर्यंत 17 जणांना ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत 11 आणि 12 डिसेंबर या दोन दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.
शुक्रवारी मुंबईत तीन आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळले. त्यामध्ये एका तीन वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत 11 आणि 12 डिसेंबर असे दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे या काळात व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली, मोर्चे, मिरवणुकांना मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार शिक्षा होणार आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, देशात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या 25 रुग्णांचे निदान झाले आहे. या वाढत्या रुग्णसंख्येबाबत देशाच्या कोरोना कृतिदलाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. मात्र, लसीकरण झालेल्या नागरिकांना घाबरण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.