ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला असून, आतापर्यंत 33 रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचे निदान झाले आहे. दरम्यान, देशातील 27 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने केंद्राने संबंधित 10 राज्यांना अलर्ट करुन परिस्थितीनुसार नाईट कर्फ्यू व निर्बंध लावण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोना संसर्ग वाढत असलेल्या 10 राज्यांना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी तातडीचे पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देशातील कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. मात्र, 10 राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. काही जिल्हे हॉटस्पॉट ठरत आहेत. 3 राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्के आहे. तर 7 राज्यातील 19 जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे. त्यामुळे या भागावर बारीक लक्ष ठेवण्यात यावे. समूह संसर्ग आढळल्यास तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करावा.
तसेच परिस्थितीचा विचार करून गरज पडल्यास नाईट कर्फ्यू, जमावबंदी असे आदेश लागू करावेत. विवाह सोहळे, अंत्यसंस्कार यासाठीच्या उपस्थितीवरही मर्यादा आणाव्यात, असेही या पत्रात म्हटले आहे.