ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय रोखला आहे. ऑमिक्रॉनचा संसर्ग झालेले 14 देश वगळता येत्या 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक सामान्य होणार होती. मागील महिन्यात 26 तारखेला केंद्र सरकारने यासंर्भात निर्णय जाहीर केला होता. मात्र, आता बहुतांश देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध आणल्याने भारत सरकारनेही आपला निर्णय तूर्तास स्थगित केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणावर निर्बंध आणले आहेत. मागील वषी जुलै महिन्यात 28 देशांशी झालेल्या एअर बबल करारानुसार विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली होती. आता आंतरराष्ट्रीय वाहतुकीवरील सर्व निर्बंध हटविण्यात येणार होते. मात्र, ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता ही वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील काळात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू केली जाईल. याची तारीख निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल, असे डीजीसीएने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
ओमिक्रॉनचा संसर्ग जगभरातील 22 देशात झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक देश खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध आणत आहेत.