सांगली / प्रतिनिधी
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी व त्याचा प्रतिबंध करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे संपूर्ण लसीकरण पहिला व दुसरा दोन्ही डोस होणे गरजेचे आहे. दि. 9 व 10 डिसेंबर रोजी कोविड-19 महालसीकरण अभियान दिवस टप्पा दोन राबविण्यात येत आहे. या दिवशी ज्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस विहीत कालावधी संपूनही अद्याप घेतला नाही तसेच ज्यांनी अद्यापही कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही अशांनी या अभियानामध्ये लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
दिनांक 9 व 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या कोविड-19 महालसीकरण अभियानाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, जिल्ह्यात दि. 9 व 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या कोविड-19 लसीकरण अभियानामध्ये 4 लाखाहून अधिक नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत. तसेच पात्र असूनही अद्याप कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेले जवळपास 15 टक्के नागरिक आहेत. अशांच्या लसीकरणासाठी महालसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी महानगरपालिकेचे काही प्रभाग, जत, आटपाडी, खानापूर या तालुक्यातील लसीकरणाचे प्रमाण जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्याच्या तुलनेत कमी आहे. या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही केले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी, कोरोना होवू नये अथवा झाल्यास त्याचा गंभीर प्रतिकूल परिणाम होवू नये यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस अनिवार्यच असल्याचे अधोरेखित केले.