गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
प्रतिनिधी/ सातारा
जग व देशभरात सध्या ओमीक्रोन नावाच्या कोरोना व्हायरसची उलट सुलट चर्चा सुरु आहे. समाज माध्यमांमध्येही त्याबाबत अफवांची पीक उमटू लागले आहे. मात्र, राज्य शासन या विषयावरुन गंभीर असून परदेशातून येणाऱया नागरिकांना विमानतळावरच टेस्टिंग, क्वारंटाईन केले जात आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने टास्क फोर्स व आरोग्य विभागाची बैठक घेवून याचा आढावा घेतला असून नागरिकांनी विनाकारण घाबरुन जावू नये. राज्य शासन उपाय योजनांसाठी खंबीर असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
जिल्हय़ात कोरोना बाधित वाढीचा वेग मंदावला असतानाच ओमीक्रोन व्हायरसबाबत उलट सुलट चर्चा सुरु असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व ातावरण आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी मंत्री शंभूराज देसाई यांनी संवाद साधला. ते म्हणाले, आफ्रिकेत या नव्या व्हायरसचे संक्रमण झाल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने उपाय योजना राबवल्या आहेत. विमानतळावर परदेशातून येणाऱया नागरिकांची कोरोना टेस्ट करुन त्यांना क्वारंटाईनही केले जात आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व विभागांना सतर्क केले असून मंत्रीमंडळासह कोरोना टास्क फोर्स, आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांची व्हिडिओ कॉन्स्फरन्स घेवून या स्थितीचा आढावा घेतला आहे. स्थानिक पातळीवर किंवा सातारा जिल्हय़ात अद्याप परदेशातून कोणी नागरिक आलेले नाहीत. याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हाधिकारी याबाबत नागरिकांशी संवाद साधून वास्तव माहिती देतील असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
राज्यशासन उपाय योजनांसाठी खंबीर
कोरोनाच्या दोन लाटांच्या काळात महाराष्ट्रातील राज्य सरकाराने चांगले काम केले आहे. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे काम असून भविष्यात देखील अशी काही स्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास व त्यासंदर्भातील उपाय योजना करण्यास राज्य शासन खंबीर असून नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवून घाबरुन जावू नका. अशा प्रकारे कोणी अफवा पिकवत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री देसाई यांनी केले आहे.