वार्ताहर / कसाल:
जिल्हा मुख्यालयासह कसाल पंचक्रोशीत आणि जिल्हय़ाच्या विविध भागात गेले काही दिवस सातत्याने पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे मोठे नुकसान होणार असल्याने फळ बागायतदार शेतकऱयांची चिंता वाढली आहे. शनिवारी सायंकाळी ओरोस व कसाल परिसर तसेच कणकवली शहर व परिसरात एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला.
थंडीच्या मोसमात हवामान बदलासह अचानक पडणाऱया या पावसामुळे फलधारणेपूर्वीच आंबा व काजू पिकाचा मोहोर गळून जात आहे. यापूर्वी केलेली मेहनत व फवारणीसाठी केलेला खर्चही वाया गेल्याने बागायतदार शेतकरी चिंताक्रांत बनला आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे वाहनधारकांचाही खोळंबा झाला. महामार्गावरून प्रवास करणाऱया दुचाकीस्वारांकडे रेनकोट नसल्याने त्यांनी आजूबाजूला आश्रय घेईपर्यंतच पावसाने त्यांना चिंब करून सोडले.
कणकवलीतही मुसळधार
कणकवली : काही दिवस सातत्याने हजेरी लावणाऱया अवकाळी पावसाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास अक्षरश: धुमाकुळ घातला. मुसळधार पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडविली.
शनिवारी सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. मात्र, सकाळनंतर बऱयापैकी ऊन पडले होते. दुपार उलटू लागली तसे पुन्हा वातावरण ढगाळ बनले. सायंकाळी पावसाच्या मोठय़ा सरी कोसळू लागल्या. सध्या कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणांतर्गत उड्डाणपूल, गटार आदी कामे सुरू आहेत. त्यात मुसळधार पाऊस असल्याने पावसाचे पाणी अगदी सर्व्हिस रस्त्यावरून वाहत होते. तर थेट उड्डाण पुलावरून पाणी सर्व्हिस रस्त्यावर कोसळत असल्याने वाहन चालकांनाही अडचणी येत होत्या.
या पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे कणकवली बाजारपेठेत उघडय़ावर बसलेल्या विक्रेत्यांची एकच धांदल उडाली होती. त्याशिवाय तालुकाभरात अनेक ठिकाणी पाऊस पडत होता. साधारण तासाभाराने पावसाचा वेग मंदावला. दरम्यान पावसामुळे कुठे नुकसान झाल्याची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत तहसील कार्यालयात प्राप्त झाली नव्हती.