केपे गट काँग्रेसची मागणी : नगरनियोजनमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी परवानगी रद्द करावी
वार्ताहर /केपे
ओल्ड गोवा येथील वारसास्थळाच्या परिसरातील वादग्रस्त बंगल्याचे बांधकाम पुन्हा सुरू झाले असून नगरनियोजन खाते हे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्याकडे असल्याने त्यांनी त्याची परवानगी रद्द करावी व बांधकाम पाडावे, अशी मागणी केपे काँग्रेस गट समितीने केली आहे. यावेळी गटाध्यक्ष अवधुत आमोणकर, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत वेळीप, महिला काँग्रेस अध्यक्ष आलिंडा लासेर्दा, ऍड. जॉन फर्नांडिस, चेतन नाईक, माजी नगराध्यक्षा तेरेझा त्रावासो व इतर हजर होते.
ओल्ड गोवा येथे बांधण्यात येत असलेल्या सदर बंगल्याला 2016 मध्ये मान्यता दिली होती व हे काम आता पुन्हा सुरू झाले आहे. नगरनियोजनमंत्री असलेले उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी 3 डिसेबर रोजी ओल्ड गोवा फेस्ताच्या दिवशी या बंगल्याचे बांधकाम जमीनदोस्त करावे. कारण ओल्ड गोवाच्या ‘सायबा’ला सर्व धर्मांचे लोक मानतात, असे आमोणकर म्हणाले.
ओल्ड गोवा येथील चर्च युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले असून त्यामुळे या भागात ठरावीक परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास बंदी आहे. तरीही तेथे पूर्वी घर होते 70 मीटरांचे. तेथे आता 400 मीटरांचा बंगला होत आहे. 70 मीटरांचे जे घर होते त्याला 2016 मध्ये परवानगी दिली होती, तिही फक्त तीन वर्षांकरिता. त्या मान्यतेची मुदत 2019 मध्ये संपली. मात्र आताचे नगरनियोजनमंत्री कवळेकर यांनी मान्यता देऊन तो बंगला पूर्णही झाला आहे, असा दावा ऍड. फर्नांडिस यांनी केला. कवळेकर यांनी खराच विकासाकरिता, लोकांची सेवा करण्याकरिता भाजपात प्रवेश केला असेल, तर त्यांनी ताबडतोब संबंधित खात्याला बांधकाम पाडण्यासंदर्भात नोटीस पाठवायला लावून तो बंगला पाडावा, अशी मागणी त्यांनी केली.
कवळेकर यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश हा जनतेकरिता नसून स्वतःच्या विकासाकरिता केला आहे. केपेतील पोप जॉन हायस्कूलजवळ असलेली इमारत, जी त्यांच्या बंधूची आहे, तिची उंची वाढवली असल्याने खात्याने काम बंद पाडले होते. तेथे आता स्पेशल झोन केला आहे. त्यांच्या बंधूने बांधलेली इमारत कायद्यात बसवण्याकरिता हे केलेले आहे. तसेच केपे परिसरातील अनेक जमिनींचे रूपांतरण करण्याकरिता अर्ज गेलेले आहेत. यात काही ठिकाणी कोमुनिदादीच्या, तर काही ठिकाणी कुळांच्या जमिनींचे रूपांतरण करण्यासाठी परवानगी मागण्यात आलेली आहे. यातून हे सिद्ध होते की, कवळेकर हे काँग्रेस सोडून भाजपात जनतेच्या विकासाकरिता नव्हे, तर आपल्या विकासाकरिता गेले आहेत, असा दावा ऍड. फर्नांडिस यांनी केला.