तृणमूल काँग्रेसचे नेते चर्चिल आलेमाव यांचा सवाल
प्रतिनिधी /मडगाव
ओल्ड गोवा येथील वारसा स्थळाच्या कक्षेत येणाऱया जागेत नियमांचे उल्लंघन करून जो खासगी बंगला बांधण्यात आला तो जमीनदोस्त करण्यासाठी आपण नोटीस काढण्यास सांगितले असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करून कित्येक दिवस झाले, तरी हे बांधकाम जमीनदोस्त करण्यास विलंब का लावला जात आहे, असा सवाल तृणमूल काँग्रेसचे नेते चर्चिल आलेमाव यांनी उपस्थित केला आहे.
वार्का येथील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील सवाल उपस्थित केला. अजूनही निवडणुकीस दीड महिन्याचा काळ बाकी असून यादरम्यान आवश्यक कारवाई न झाल्यास भाजपाला चार मतदारसंघांतही विजय मिळणार नाही, असा दावा आलेमाव यांनी केला. यापूर्वी बेकायदा बाबींवर नोटिसा काढून 10 दिवसांत कारवाई झाल्याची कित्येक उदाहरणे आहेत. असे असताना ओल्ड गोवा येथील बेकायदा बांधकाम हटविण्यास विलंब का होत आहे. वारसा जतन करण्यासाठी झटणाऱयांनी तेथे उपोषण केले, तरी सरकार चालढकल करत असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी आलेमाव आम आदमी पक्षावर टीका करताना म्हणाले की, हे लोक ढोंगी आहेत. दिल्ली येथील लिटल फ्लॉवर चर्चचे बांधकाम जमीनदोस्त करून ते नंतर उभारल्याचे सांगून ते जनतेची दिशाभूल करत आहेत, असा दावा त्यांनी केला. गोंयचो सायब गोवा राखत असून येथे कोणी राजकारण करू नये, असे ते म्हणाले. सरकार व अन्य पक्ष धार्मिक राजकारण करत आहेत असे आपणास वाटत आहे काय अशी विचारणा केली असता, असे प्रकार घडत असून अलीकडेच बजरंग दलाने एक कपेल उभारणीचे काम बंद करण्याचा प्रयत्न केला, असा दावा त्यांनी केला. यावेळी विश्व हिंदू परिषदेवरही त्यांनी टीकास्त्र सोडले.
राष्ट्रवादीशी युतीची बोलणी, 4 जागा सोडण्याचा विचार
तृणमूल काँग्रेसचे उमेदवार कधी जाहीर केले जातील अशी विचारणा केली असता, लवकरच पक्षश्रे÷ाr त्यासंदर्भात घोषणा करतील, असे आलेमाव यांनी सांगितले. तसेच आपणाकडे राष्ट्रवादी काँग्रेसने युतीसाठी बोलणी केली आहे. त्यांना चार जागा देण्याबाबत विचार चालू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सोडण्यात येणारे मतदारसंघ कोणते असे विचारले असता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांसाठी दाबोळी मतदारसंघ तसेच अन्य काही मतदारसंघ सोडण्यासंदर्भात बोलणी चालू असल्याचे आलेमाव यांनी एका प्रश्नावर सांगितले.