केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा हल्लाबोल
वृत्तसंस्था / हैद्राबाद
तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमधील महापालिकेच्या निवडणुकीकरता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही भाजपचा प्रचार चालविला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस तसेच खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमवर इराणी यांनी बुधवारी शाब्दिक हल्ला चढविला आहे. दोन्ही पक्षांची आघाडी अपवित्र असून ते घुसखोरांची पाठराखण करतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
ऐतिहासिक शहर असलेल्या हैदराबादमध्ये एआयएमआयएम आणि टीआरएस घुसखोरांना तेलंगणाच्या मतदारयादीत स्थान मिळवून देण्याचे काम करत आहेत. या दोन्ही पक्षांना या कृत्याकरता उत्तर द्यावे लागणार असल्याचे इराणी यांनी म्हटले आहे.
घुसखोरांपासून सर्वसामान्य भारतीयांच्या हितांचे रक्षण सुनिश्चित करावे लागणार आहे. एआयएमआयएम आणि टीआरएस सर्वसामान्य भारतीय किंवा हैदराबादच्या मतदारांसोबत नाही तर घुसखोरांच्या पाठिशी उभे आहेत. घुसखोरांच्या माध्यमातून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांचा असल्याचे इराणी म्हणाल्या.
एआयएमआयएम नेत्यांनी स्वतःच्या राजकीय कार्यालयाचा गैरवापर केला आहे. मतदारांच्या यादीत घुसखोरांना सामील करणाऱया एआयएमआयएम नेत्यांच्या विरोधात केसीआर यांच्या सरकारने कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे.