काश्मीरमध्ये सैन्याची मोठी कारवाई – 26 जणांना अटक
वृत्तसंस्था/ पुंछ
जम्मू-काश्मीरमध्ये मागील 30 दिवसांपासून दहशतवाद्यांच्या विरोधात व्यापक स्तरावर मोहीम चालविली जात आहे. सुमारे 50 किलोमीटरच्या जंगलाच्या कक्षेत ही मोहीम सुरू आहे. 11 ऑक्टोबर रोजी पुंछमध्ये सैन्याच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता, ज्यात 5 सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर कित्येक तास दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती, पण दहशतवादी घनदाट जंगलाचा लाभ घेत भट्टा दूरिया या वनक्षेत्रात जाऊन लपले होते. सैन्य आणि पोलिसांचे पथक दहशतवाद्यांचा पाठलाग करत होते. या दहशतवाद्यांसाब्sात पुन्हा 13 ऑक्टोबर रोजी चकमक झाली, ज्यात 4 सैनिक हुतात्मा झाले होते. तेव्हापासून या दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम सुरू आहे.
या मोहिमेत सैन्यासोबत जम्मू-काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रूप देखील सामील आहे. पण किती दहशतवादी आहेत आणि कुठे लपले याची पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही. जंगलात काही नैसर्गिक गुहा असून तेथे दहशतवादी लपलेले असू शकतात असे सूत्रांचे म्हणणे आहे. या दहशतवाद्यांना भोजन तसेच माहिती स्थानिक लोक पुरवत होते, हे लोक आयएसआयला पैशांच्या बदल्यात मदत करत असतात. त्यांना ओव्हर ग्राउंड वर्कर देखील म्हटले जाते. पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांना अटक केली असून ते दहशतवाद्यांपर्यंत अन्न पोहोचविण्यासह सुरक्षा दलांच्या हालचालींची माहिती पुरवत होते.
पुंछ जिल्हय़ातील तीन ओव्हर ग्राउंड वर्कर्सनी नेपाळमध्ये पलायन केले होते. तेथून सौदी अरेबिया आणि मग पाकिस्तानात पोहोचण्याची त्यांनी तयारी केली होती. पण पोलिसांनी त्यांना काठमांडू विमानतळावरून अटक केली आहे. तर मंगळवारी रात्री 5 जणांना मेंढर, सुरनकोट, राजौरी येथून पोलिसांनी अटक केली आहे. सीमेपलिकडून संदेश मिळाल्यावर भारतात घुसखोरी करणाऱया दहशतवाद्यांना पुढील मार्गाची माहिती देत होतो, तसेच त्यांच्या वास्तव्य आणि भोजनाची व्यवस्था करायचो अशी कबुली या आरोपींनी दिली आहे.