भारताला मध्यफळीतील खराब फॉर्मची मुख्य चिंता, जलद गोलंदाजांवरील वर्कलोड कमी करण्यासाठी बदलाचे संकेत
लंडन / वृत्तसंस्था
खराब फॉर्ममधील उपकर्णधार अजिंक्य रहाणेला वगळले जाणार का आणि अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला स्थान दिले जाणार का, याबद्दलचे 2 निर्णय भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध आजपासून चौथ्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी अधिक प्रभावी ठरु शकतील, असा होरा आहे. यापूर्वी, लीड्समधील तिसऱया कसोटी सामन्यात भारताचा डावाने धुव्वा उडाला होता. त्या पार्श्वभूमीवर, भारताला येथे नव्या रणनीतीवर भर द्यावा लागेल, हे निश्चित आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होईल.
या मालिकेत लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने दमदार विजय साकारला. मात्र, हेडिंग्लेत दोन्ही डावात फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातल्यानंतर विराटसेनेला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, विराटने म्हटल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे लॉर्ड्स कसोटीत विजय संपादन केला म्हणून पुढील कसोटी जिंकता येणार नाही आणि हेडिंग्लेत पराभव पत्करावा लागला, म्हणून पुढील कसोटीत त्याच निकालाची पुनरावृत्ती होईल, असे गृहित धरणे योग्य ठरत नाही, हे देखील लक्षवेधी आहे. सध्या उभय संघातील ही मालिका 1-1 बरोबरीत असल्याने ओव्हलवरील ही लढत विशेष महत्त्वाची असणार आहे.
मधल्या फळीवर बरीच भिस्त
भारताने यापूर्वी, तिसऱया कसोटीत नामुष्कीजनक कामगिरीसह धक्कादायक पराभव पत्करल्यानंतर त्याचे अनेक पडसाद उमटले. चाहत्यांनी आणि तज्ञांनी रोष व्यक्त करणे साहजिक होते. पण, आपली फलंदाजी लाईनअप अपयशी ठरत आहे, याची भारतीय कर्णधार विराट कोहलीला पूर्ण जाणीव आहे. मध्यफळीत स्वतः विराट, चेतेश्वर पुजारा व उपकर्णधार अजिंक्य रहाणे असे तिन्ही फलंदाज खराब फॉर्ममधून जात असल्याने त्याची भारताला पराभवाच्या रुपाने मोठी किंमत मोजावी लागली आहे आणि याची पुनरावृत्ती व्हायची नसेल तर मधल्या फळीने क्लिक होणे निव्वळ क्रमप्राप्त असणार आहे.
पुजाराने 91 धावांची दमदार खेळी साकारत गतवैभवाची चुणूक जरुर दाखवली. पण, रहाणेने काही वेळा उत्तम सुरुवात केल्यानंतरही अद्याप पूर्ण आत्मविश्वासाने फलंदाजी केल्याचे दिसून आलेले नाही. अगदी मेलबर्नमधील शतक किंवा लॉर्ड्सवरील अर्धशतकही त्याचा हरवलेला विश्वास परत आणू शकलेले नाही, ही खरी चिंता आहे. 5 डावात अवघ्या 19 च्या सरासरीने केलेल्या 95 धावा रहाणेच्या लौकिकाला साजेशा नाहीत. त्या पार्श्वभूमीवर, सूर्यकुमार यादव व हनुमा विहारीसारखे फलंदाज मध्यफळीत नवा उत्साह आणू शकतील का, याची चाचपणी सुरु असल्यास त्यात आश्चर्याचे कारण नाही.
रहाणेला वगळण्याचा निर्णय झाला तर विहारीला तो ऑफस्पिन गोलंदाजीही करु शकत असल्याने संधी मिळण्याची किंचीत अधिक संधी असू शकते. पण, अगदी सुनील गावसकरांनी अतिरिक्त फलंदाज खेळवा, असे सुचवले असले तरी त्याकडेही दुर्लक्ष करण्याची धमक यापूर्वी विराटने दाखवली असल्याने येथे संघात खरोखरच बदल होणार का, याबद्दल काहीच चित्र स्पष्ट नाही. प्रत्यक्ष नाणेफेकीवेळीच त्याबद्दल स्पष्टता येईल, असे संकेत आहेत.
जलद-मध्यमगती गोलंदाजीत बदलाचा निर्णय झाल्यास निष्प्रभ ठरत चाललेल्या इशांत शर्माऐवजी शार्दुल ठाकुरला संधी दिली जाऊ शकते. अष्टपैलू शार्दुल फलंदाजीतही उपयुक्त योगदान देण्याची क्षमता राखून आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर.
इंग्लंड ः जो रुट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, रोरी बर्न्स, सॅम करण, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, डेव्हिड मलान, ओव्हर्टन, ऑलि पोप, ऑलि रॉबिन्सन, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ ः दुपारी 3.30 पासून.
प्रसिद्ध कृष्णाचा मुख्य संघात समावेश
मागील तीन महिन्यांपासून राखीव खेळाडू म्हणून समाविष्ट असलेल्या कर्नाटकचा स्पीडस्टार प्रसिद्ध कृष्णाला या लढतीसाठी मुख्य संभाव्य संघात निवडले गेले आहे. प्रसिद्धचा मुख्य संघात समावेश केल्याने त्याला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यताही चर्चेत आली आहे. जसप्रित बुमराह, सिराज व शमी यांनी मालिकेत बरीच गोलंदाजी केली असून त्यांच्यावरील वर्कलोड कमी करण्याच्या दृष्टीने असा निर्णय घेतला जाऊ शकतो. 25 वर्षीय प्रसिद्ध कृष्णाने आतापर्यंत केवळ 9 प्रथमश्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने 34 बळी घेतले आहेत. यंदा इंग्लंडविरुद्धच त्याने 3 वनडे खेळत त्यात 6 बळी घेतले आहेत.
अश्विनला संधी देणार की पुन्हा जडेजालाच खेळवणार?
रविंद्र जडेजाने या मालिकेतील 3 सामन्यात केवळ दोनच बळी घेतले असून प्रामुख्याने त्याला सातव्या स्थानी फलंदाज म्हणूनच खेळवले गेल्याचे स्पष्ट होते. मात्र, अश्विन जागतिक स्तरावरील सध्याचा सर्वोत्तम फिरकीपटू मानला जातो आणि त्यामुळे त्याचा निवडीत विचार होऊ शकतो. ओव्हलची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक मानली जाते. त्यामुळे ही बाबही विचारात घेतली जाऊ शकते.
अश्विनने सरेकडून कौंटी सामन्यात खेळताना सॉमरसेटचे 6 फलंदाज बाद केले होते आणि इंग्लिश फलंदाजांना पेचात टाकण्याचा त्याचा अनुभव देखील बलस्थान ठरु शकते. अर्थात, विराटची नेहमी 4 जलद-मध्यमगती गोलंदाजांना पसंती असते, हे पाहता अंतिम संघनिवडीत फेरबदल केले गेल्यास ते कसे असतील, हे पहावे लागेल.
भारतासमोर कर्दनकाळ जो रुटचेही आव्हान
इंग्लंडचा कर्णधार जो रुट भारताविरुद्ध नेहमीच बहरतो आणि या मालिकेतील 3 सामन्यात त्याने 500 पेक्षा अधिक धावांची आतषबाजी करत आपल्या फॉर्मची प्रचिती आणून दिली आहे. साहजिकच, या लढतीत देखील रुटला कसे रोखायचे, हा प्रश्न विराटसमोर आ वासून उभा असणार आहे. सध्याच्या घडीला रुटला पेचात टाकू शकेल, असा एकच गोलंदाज अश्विनच्या रुपाने उपलब्ध आहे. त्यामुळे देखील अश्विनला अंतिम क्षणी पसंती मिळू शकते. अश्विनला संधी मिळाली तर रुट विरुद्ध अश्विन यांच्यातील जुगलबंदी लक्षवेधी ठरु शकते.
बटलरच्या गैरहजेरीत मोईन अली उपकर्णधार
ओव्हलवरील या लढतीत जोस बटलर उपलब्ध नसल्याने इंग्लंडच्या उपकर्णधारपदी मोईन अलीला नियुक्त केले गेले आहे. दुसऱया अपत्याच्या प्रतीक्षेत असणाऱया बटलरने या लढतीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. 34 वर्षीय मोईन अलीने आजवर 63 सामने खेळले असून त्यात 5 शतकांसह 2879 धावा झळकावल्या आणि 193 बळीही घेतले आहेत.