लांडेवाडी, नांदोशी येथे आंबा घन लागवड कार्यक्रम
प्रतिनिधी / औंध
कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवडीची माहिती देऊन जागृती करुन ही योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून औंध मंडल विभागातील ११० हेक्टर क्षेत्रावरील फळबाग लागवडीचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे यांनी केले.
नांदोशी आणि लांडेवाडी ता. खटाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत आंबा घन लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी अक्षय सावंत, कृषी पर्यवेक्षक विजय वसव, कृषी सहाय्यक यु.एम तिकोटे, मोहन मदने, गणेश सपकाळ, ए. डी चोरमले, एम. एम. गायकवाड, के. आर शिंदे, टी. बी चव्हाण, शेतकरी रघुनाथ चव्हाण, निलेश सुर्यवंशी, ग्रामस्थ उपस्थित होते
झेंडे म्हणाले की औंध कृषी मंडल कार्यक्षेत्रात प्रत्येक कृषी सहाय्यकांना १० हेक्टर क्षेत्रावर फळपीक लागवडीचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मधून उदिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर तसेच सलग क्षेत्रावर लागवड करता येणार आहे. योजनेतून शेतकऱ्यांनी आंबा चिकू नारळ पेरू सिताफळ इत्यादी फळपिकांची लागवड करावी त्यासाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध आहे लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता कृषी सहाय्यक यांच्याकडे करावी आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी अक्षय सावंत यांनी प्रास्ताविक केले औंध कृषी पर्यवेक्षक विजय वसव यांनी आभार मानले.