आमणापुर पुल व नागठाणे बंधाराही गेला पाण्याखाली..
भिलवडी / वार्ताहर :
कृष्णा नदी च्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून औदुंबर येथील दत्तमंदिरामध्ये पाणी शिरले आहे. तसेच नागठाणे येथील बंधारा ही पाण्याखाली गेला आहे. सांयकाळी आमणापुर पुल पाण्याखाली गेल्यामुळे पलुस तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
कोयना धरण व कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रांमध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवार दि. 22 जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला असून दुपारी दोन वाजता औदुंबर येथील दत्त मंदिरामध्ये पाणी शिरले आहे. रात्री उशिरा आमणापूर पूल पाण्याखाली गेला आहे तर उद्या सकाळपर्यंत भिलवडी पुला जवळ पाणी पातळी चाळीस फुटावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान झपाट्याने वाढत असणारी पाणीपातळी पाहता कडेगाव प्रांताधिकारी गणेश मरकड, पलूसचे तहसीलदार निवास ढाणे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग,तलाठी गौसमहंमद लांडगे यांनी भिलवडी, अंकलखोप, सुखवाडी, चोपडेवाडी, नागठाणे या गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी संभाव्य महापूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन पूरग्रस्त भागातील लोकांना स्थलांतरित करण्यात येणारे ठिकाण व तिथे देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा यांची पाहणी केली.