ऑनलाईन टीम / पुणे :
उद्योग करताना तरुणांनी संयम ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही उद्योगात यश लगेच मिळणार नाही. त्यामुळे अपयशाने लगेत खचून जाऊ नये. औद्योगिकरणासोबत तरुणांनी शेतीकडे देखील वळायला हवे. कोणतेही काम करण्याची लाज वाटून घ्यायला नको. तरच आपला देश पुढे जाईल. आपला देश नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहे. हजारो एकर जमिनी पडून आहेत. भारताच्या मसाल्यांना तसेच आयुर्वेदाची मागणी लक्षात घेता आयुर्वेदीक शेती करायला पाहिजे. असे मत खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित ऑनलाईन महागणेशोत्सवातील घेऊ भरारी – चला उद्योजक बनूयात या कार्यक्रमाचे उद्घाटन बापट यांनी ऑनलाईन केले. यावेळी ते बोलत होते. सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष रविंद्र बरीदे, शिरीष मोहिते, वैभव वाघ,निलेश रनसिंग, तन्मय तोडमल, विक्रांत मोहिते, अमेय थोपटे, कुणाल जाधव, गणेश सांगळे उपस्थित होते. प्रसाद भारदे यांनी मुलाखत घेतली.
गिरीष बापट म्हणाले, सेवा मित्र मंडळ केवळ गणेशोत्सवच तर वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम मंडळातर्फे राबविले जातात. समाज प्रबोधन मंडळाने जाणीवपूर्वक जपले आहे. घेऊ भरारी हा चांगला उपक्रम मंडळाने सुरु केला आहे. तरुणांना दिशादर्शक ठरणारा हा उपक्रम आहे, असेही त्यांनी सांगितले.
उत्सवाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. घेऊ भरारी या कार्यक्रमात आगामी दशक शेती व्यवसायाचे, शेतक-यांचे याविषयावर अभिनेते प्रविण तरडे, उद्योजक व्यक्तीमत्व घडविताना याविषयावर आमदार रोहित पवार, फळ-भाजीपाला प्रक्रिया-एक नवीन संधी याविषयावर संजय ओरपे, व्यवसाय आणि मार्केटिंग याविषयावर धनंजय दातार, ब्रँड डेव्हलपमेंट याविषयावर अॅडगुरु व दिग्दर्शक रवी जाधव आणि घेऊ भरारीमध्ये खासदार अमोल कोल्हे हे देखील संवाद साधणार आहेत.