प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही शब्द अनेकवेळा आपण ऐकत असतो. पण प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय हे नेमके आपल्याला कळत नाही. प्रपंच आणि परमार्थात गैरसमज निर्माण झाल्याने प्रपंच करता येत नाही आणि परमार्थ नीट कळत नाही. परमार्थात आणि प्रपंचात एक बारीक सीमारेषा असते. सामान्य मनुष्याला आपण प्रपंच कसा करतो आहोत आणि परमार्थ कसा साधावा हे कळत नसल्याने त्याची घुसमट होत असते. आपल्या भारतीय संस्कृतीत संतांनी आणि सत्पुरुषांनी प्रपंच आणि परमार्थातील भेद नीट समजावून सांगितला आहे. श्रीसमर्थांनी तर स्पष्ट शब्दात ‘आधी प्रपंच करावा नेटका!’ हे सांगितले आहे.
प्रपंचाविषयी उत्तर समर्थांनी दिलेले आहे. प्रपंच हा मुळातच नासका असल्याने तो नेटका करायचा असतो आणि परमार्थाला नेटका बनवण्याची गरज नसते, कारण, तो मुळातच नेटका असतो. ज्यांना परमार्थात उंची गाठायची आहे त्यांनी प्रपंच सोडून देऊन चालत नाही. प्रपंच म्हणजे धावणे आणि परमार्थ म्हणजे थांबणे! जर आपण धावलोच नाही तर कुठे थांबायचे हे कळणार कसे? किती धावायचे, कुठे थांबायचे आणि थांबल्यानंतर पुढचा प्रवास कसा करायचा हे जाणून घ्यायचे असेल तर श्रीसमर्थांचा दासबोध, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांच्या गाथांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
मनुष्य जन्म जरी आपल्याला मिळाला असला तरीही मनुष्याला अनेक मर्यादा असतात. एकटी व्यक्ती ही फक्त स्वतःची आणि शक्मय झाल्यास स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी उत्तमरीतीने पार पाडू शकते पण संपूर्ण समाज किंवा राष्ट्राची जबाबदारी पार पाडणे त्या एका व्यक्तीस शक्मय नाही. व्यवस्थापन शास्त्रातसुद्धा सांघिक कार्य (ऊाaस् sंदक्) केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. एखाद्या औद्योगिक संस्थेतील व्यवस्थापकाने सर्व कार्य स्वतःच करण्याचा निर्णय घेतला तर ते कार्य पार पाडले जाणार नाही. त्या व्यवस्थापकास कामगार आणि कर्मचाऱयांची मदत घ्यावीच लागते.
समाज नेतृत्व निर्माण करते की नेतृत्व समाज निर्माण करतो हा प्रश्न नेहमीच विचारला जातो पण ह्याचे उत्तर जरी अगदी योग्यरीतीने देता आले नाही तरीही परिस्थितीनुसारच समाज आणि नेतृत्वाची निर्मिती होत असते. परिस्थिती अनुकूल असेल तर समाजाची काय भूमिका असावी? नेतृत्वाची काय जबाबदारी असावी? तसेच परिस्थिती प्रतिकूल असल्यावर समाजाने कुठली जबाबदारी निभवावी आणि नेतृत्वाने काय भूमिका स्वीकारावी ह्यावरच संबंधित मानवी समूहाची दिशा ठरत असते.
ज्याप्रमाणे कुटुंबात मनुष्यप्राण्याचा समावेश होतो त्याप्रमाणे ह्या कीटक, पशु, पक्षी ह्यांचादेखील समावेश होतो. हाच नियम व्यवस्थापन शास्त्रातसुद्धा लागू पडतो. कार्यालयात केवळ उत्तम व्यवस्थापक असून चालत नाही तर कामगार/कर्मचारी ह्यांची आवश्यकता असते. अनेक कुटुंबे जेव्हा एकत्र होतात तेव्हा एक मानवी समूह तयार होतो आणि असे अनेक मानवी समूहांचे एकत्रीकरण म्हणजेच समाज निर्मिती होय! त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रमुख सदस्य जसा वागेल-बोलेल, जसा व्यवहार घरात आणि समाजात करेल तसाच परिणाम कुटुंबातील इतर सदस्यांवर होईल त्यानुसार उद्योगसमूहातील व्यवस्थापक जसे आचरण करतील तसेच आचरण कामगार आणि कर्मचारी करतील ह्यात शंका नाही. जर उद्योगसमूहाचा प्रमुख सत्त्वगुणी असेल तर त्या उद्योगसमूहात आपोआपच सात्विकता निर्माण होईल, जर प्रमुख रजोगुणी असेल तर तेथे रजोगुणाचा प्रभाव वाढेल आणि जर प्रमुख सदस्य तमोगुणी असेल तर मात्र निश्चितच उद्योगसमूहातील व्यवस्थापक, कर्मचारी आणि कामगार तमोगुणाच्या आहारी जातील आणि नाश होईल. त्याकरिताच व्यवस्थापकाने कसे असावे हे त्याचे त्याने/तिने ठरवावे. त्यांच्या आचरणावरच औद्योगिक संस्थेचे भविष्य अवलंबून असते.
श्रीसमर्थांनी वाल्मिकीस्तवन समासात खूप उत्तमरीतीने ह्याविषयी सांगितले आहे. श्रीसमर्थ म्हणतात की,
वाल्मिकें जेथें तप केले !
ते वन पुण्यपावन जालें !
शुष्क काळी अंकुर फुटले !
तपोबळे जयाच्या !
पूर्वी होता वाल्हा कोळी !
जीवघातकी भूमंडळी !
तोची वंदिजे सकळीं !
विबुधी ऋषेश्वरिं !! 10-11/01/16
म्हणजे, वाल्मिकींनी जेथे तप केला ते वन पवित्र झाले. त्यांच्या तपोबळाने शुष्क किंवा सुकलेल्या झाडाच्या खोडालाही पालवी फुटून ते हिरवेगार झाले. पूर्वी असलेला वाल्या कोळी हा दुष्ट आणि घातकी होता. पुढे तोच वाल्मिकी नावाने महषी झाला आणि असंख्य विद्वानांना तसेच ऋषीमुनींना वंदनीय ठरला. जोपर्यंत वाल्मिकी ऋषी हे वाल्या कोळी होते तोपर्यंत त्यांनी अनेक विघातक कृत्ये केली. त्यांच्या ह्या विघातक कृत्याचे समर्थन त्यांच्या कुटुंबीयांनी केले. परंतु, जेव्हा ते कुटुंबीय त्यांच्या पापाचे भागीदार होतील का असे विचारल्यावर मात्र कोणीही त्यास होकार दिला नाही. ह्या प्रसंगामुळे वाल्मिकींचे हृदय परिवर्तन झाले आणि नारदमुनींनी केलेल्या उपदेशाने ते रामनाम जप करू लागले. त्यांच्या जपाचे सामर्थ्य एवढे वाढले की ज्या वनात त्यांनी जप केले ते पवित्र झाले आणि तेथील पशु-पक्षी ह्यांची वृत्तीदेखील सात्विक झाली. ह्याचा अर्थ ते संपूर्ण वन हे एक कुटुंब झाले, त्या वनातील वृक्ष, लता-वेली, पशु-पक्षी हे कुटुंबातील सदस्य झाले आणि महषी वाल्मिकी हे कुटुंबप्रमुख झाले. रामायणासारखा अद्भूत ग्रंथ त्यांनी लिहिला आणि ते जगद्वंद्य ठरले.
याकरिताच संबंधित औद्योगिक संस्थेच्या प्रमुखांनी नेहमीच स्वतःचे आचरण शुद्ध ठेवावे. स्वतःचे सातत्याने आत्मपरीक्षण करावे पण आत्मवंचना करू नये. आत्मघातकी विचार मनातून काढून टाकावे. प्रपंच आणि परमार्थ नीट साधावा. स्वतःच्या संस्थेतील सदस्यांना मानसिकदृष्टय़ा कणखर बनवावे, त्यांच्यात औद्योगिक संस्थेकरिता जिव्हाळा निर्माण करावा, ईश्वराची भक्ती वाढवावी आणि स्वतःसहित पुढील पिढय़ांचा उद्धार करण्याचा प्रयत्न करावा. ह्यातूनच उत्तम समाज निर्मिती आणि त्याद्वारे राष्ट्रनिर्मिती होऊ शकते.
माधव किल्लेदार