ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अखेर प्रशासनाने वाळूज परिसरात नंतर औरंगाबाद शहरातही 10 ते 18 जुलैपर्यंत पुन्हा एकदा कठोर लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या लॉक डाऊनच्या काळात आरोग्य सेवा व दूध वगळता सर्व आस्थापने, उद्योग, पेट्रोलपंप, भाजी मंडई, किराणा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योग आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले सध्या वाळूज परिसरात संचारबंदी सुरू आहे. शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी पुन्हा एकदा लॉक डाऊन करण्यात यावा अशी जनतेची मागणी होती. त्यामुळे जनता संचारबंदी असे शब्द वापरून शहरात कडक टाळेबंदी केली जाईल. तसेच लोकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, किराणा व भाजीपाला यांचा अतिरिक्त साठा करू नये असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
– जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार पार
दरम्यान, सध्या औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने 7 हजारचा टप्पा पार केला आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत 77 रुग्णांची वाढ झाली. यामध्ये मनपा हद्दीतील 72 जण, तर ग्रामीण भागातील 5 जणांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7017 वर पोहोचली आहे. यापैकी 3571 रुग्ण बरे झाले असून 318 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.