ऑनलाईन टीम/तरुण भारत
अभिनेत्री कंगना रणौतने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक मागून मिळालं होतं, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यांनंतर अनेकांनी कंगनाची निषेध करत तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच तिचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशीदेखील मागणी होत आहे. दरम्यान, कंगनाच्या या वक्तव्यावर ओवेसींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच “कंगनाने केलेलं वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमाने केले असते तर युएपीए अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली असती, तसेच पायावर गोळी झाडत तरुंगात रवानगी करण्यात केली असती,” असं ओवेसींनी म्हटलं आहे.
ओवेसींनी सरकारवर निशाणा साधताना “ती ‘क्वीन’ आहे आणि तुम्ही इथले राजे आहात, त्यामुळे तिच्यावर तुम्ही कारवाई करणार नाही.” अशी खोचक टीका केली आहे. “बाबांनी तर टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत काही बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरूंगात टाकलं होतं” असं म्हणत ओवेसींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या भारतीयांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कंगनावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल का? असा प्रश्न त्यांनी योगी आणि मोदींना विचारला. “देशद्रोहाचा गुन्हा फक्त मुस्लिमांवरच लागू होतो का?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.