- बीएमसीवर कारवाई होण्याची शक्यता
ऑनलाईन टीम / मुंबई :
कंगना रानौतने तिच्या पाली हिलमधील कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाली. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतचा आपला निकाल राखून ठेवला आहे.
पालिकेने या कारवाईची नोटीस बजावली त्यावेळी केवळ बंगल्यात केवळ वॉटर प्रुफिंगचे काम सुरु होते. त्यासाठी पालिकेची रितसर परवानगीही घेण्यात आली होती. मात्र हे काम बेकायदा ठरवत पालिकेकडून कारवाई करण्यात आल्याचा दावा कंगनाने केला आहे.
विकत घेतल्यापासून आजवर प्रत्येकवेळी सोसायटी, पालिका यांची पूर्व परवानगी घेऊनच काम केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा या कार्यालयाचे नूतनीकरण पूर्ण झाले होते तेव्हा एका आंतरराष्ट्रीय मासिकानेही त्याची दखल घेतल्याची माहिती कंगनाने हायकोर्टात दिली. तसेच पालिका ज्याला बेकायदेशीर ठरवत आहे तसं बांधकाम त्या सोसायटीत अनेकांनी केलं आहे, मग कारवाई फक्त आपल्यावरच का?, मला एक नोटीस आणि त्याच कारणासाठी शेजाऱ्याला दुसऱ्या कलमाखाली नोटीस असं का?, असे सवाल कंगनाने उपस्थित केले आहेत.
या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज सुनावणी घेण्यात आली.
कंगनाने केलेले बेकायदेशीर बांधकाम जर आधीपासूनच तिथे उभे होते तर मग त्यावर कारवाई नेमकी त्याच दिवशी कशी झाली? सुरुवातीपासूनच बीएमसी आणि कंगना यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना बीएमसीला चांगलेच सुनावले आहे. कुणाच्या बंगल्यातील बांधकाम पाडताना जी तत्परता दाखवली. एवढेच तत्परता मुंबईतील अन्य अनधिकृत बांधकामे पाडताना दाखवली असती तर मुंबई आज एक राहण्यायोग्य सुनियोजित शहर बनले असते अशा शब्दात मुंबई हाय कोर्टाने बीएमसी चे कान टोचले. एका दिवसांत बीएमसीने जेसीबी घेऊन ते बांधकाम पाडण्याची अतिघाई का केली?, यावरुन नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले.