प्रतिनिधी / कोल्हापूर
देशाच्या स्वातंत्र्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱया अभिनेत्री कंगना राणावतचा शिवसेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला. शहर शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात कंगना हिच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करण्यात आले तर ऐतिहासिक बिंदू चौकात जिल्हा शिवसेनेकडून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी कंगान राणवतच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पद्मश्रीसह सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्याची मागणी केली.
अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाला 1947मध्ये मिळालेले स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014मध्ये मिळाले, असे वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. कोल्हापूरातही याची तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेकडून बिंदू चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक तर भाकपकडून मध्यवर्ती बस स्थानक येथे कंगना राणवताच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहर शिवसेनेच्यावतीने कंगना राणावत हिच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सेनेच्या रणरागिणींनी पुतळ्यास जोडे मारत स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान करणाऱया कंगना राणावतचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बिंदू चौक येथील महिला कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत, काळे फासत पुतळ्याचे दहन करत निषेधार्थ घोषणाबाजी केली.
शिवाजी चौक येथे करण्यात आलेल्या निदर्शनावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख जयवंत हारुगले, महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, पुजा भोर, गौरी माळतकर, पुजा कामते, सुनिता भोपळे, युवासेना शहरप्रमुख चेतन शिंदे, पियुष चव्हाण आदी उपस्थित होते. तर बिंदू चौक येथे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, माजी आमदार सुरेश साळोखे, युवासेना जिल्हध्यक्ष मंजीत माने आदी उपस्थित होते.