नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे चर्चेत आलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला आता केंद्र सरकारकडून सुरक्षेचे नवे गिफ्ट मिळाले आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कंगनाला हिमाचल प्रदेश सरकारने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला असतानाच मोदी सरकारकडून वाय प्लस श्रेणीतील सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून कंगनाने याप्रश्नी गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले आहेत. ‘कोणत्याही देशभक्ताचा आवाज फासिस्ट चिरडू शकत नाहीत. मी अमित शहा यांची आभारी आहे.’ अशी प्रतिक्रिया कंगनाने व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी कंगनाने केलेल्या वेगळय़ा भाष्यानंतर मोठय़ा वादाला तोंड फुटले होते. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर गृह मंत्रालयाने तिला वाय श्रेणीतील सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. दरम्यान, याआधी कंगनाने आपल्याला मुंबई पोलिसांची भीती वाटते, त्यामुळे केंद्र सरकार किंवा हिमाचल प्रदेश सरकारने द्यावी असे म्हटले होते. मुंबईविषयी वक्तव्य करणाऱया कंगनावर अनेक स्तरांमधून टीका झाली होती. तिच्या वक्तव्यामुळे अनेक जण नाराज झाले आहेत. त्यामुळे तिच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.