ऑनलाईन टीम / शिमला :
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली होती. त्यानंतर सर्व स्थरावरून तिच्यावर टीका सुरु आहे. राजकीय वातावरण तर चांगलेच तापले आहे. त्यामुळे कांगनाला सुरक्षा मिळावी अशी मागणी तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आली होती. त्यानंतर हिमाचल प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबत बोलताना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले की, राज्य सरकारने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला राज्यात सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंगनाच्या मुंबई प्रवासा दरम्यानही सुरक्षा उपलब्ध करून देण्याचा विचार सरकार करत आहे.
पुढे ते म्हणाले की, कंगनाला सुरक्षा देणे हे आमचे कर्तव्य आहे. कारण ती हिमाचल प्रदेशची मुलगी आहे आणि एक सेलिब्रिटी आहे. कंगनाच्या कुटुंबीयांसोबत माझा फोनवर संवाद झाला असून हिमाचल सरकार कंगनाला पूर्ण सुरक्षा देईल.
तसेच हिमाचल प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनादेखील तसे आदेश देण्यात आले आहेत. 9 सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत जाणार असून हिमाचलच्या मुलीला सुरक्षा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.