वार्ताहर / कंग्राळी खुर्द
कंग्राळी खुर्द गावासह उपनगरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने चाळीशी पार केली असून अर्धशतकाच्या उंबरठय़ावर आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च काळजी घेण्याचे आवाहन पीडीओ आशा रायकरसह ग्राम पंचायतीतर्फे केले आहे.
दररोजच्या बुलेटिननुसार या गावच्या हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्याचबरोबर एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून एका बाधिताचा अहवाल तर अंत्यसंस्काराच्या दोन दिवसांनी आला आहे. यामुळे गावात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोक एकमेकांच्या संपर्कातून येत आहेत. त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगावी. 60 वर्षांच्या वरील नागरिकांना महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडूच नये, 10 वर्षाच्या आतील मुलांची विशेष काळजी घ्या, मास्क न घालता घराबाहेर पडू नका, सॅनिटायझरचा वापर करा, लक्षणे वाटल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधा, अजूनही गावात चौकाचौकात लोक समुहाने चर्चा करत थांबतात त्याला आवर घाला. या अनुषंगाने एपीएमसी पोलीस चौकीत गावात गस्त घालण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला जाणार असून गणपती उत्सव जवळ आल्याने लोक एकमेकांच्या जास्त संपर्कात येण्याची शक्यता असल्याने संयम पाळा, असे आवाहन ग्राम पंचायत प्रशासनाने गावासह उपनगरातील नागरिकांना केले आहे. तुमच्या मदतीसाठी आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका, टास्कफोर्स समिती असून त्यांचेही सहकार्य घ्या व त्यांनाही सहकार्य करा, असेही पीडीओ रायकर यांनी सांगितले.