खुर्च्यांचीही दुरुस्ती करण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गेल्या वर्षी ग्रा. पं. कार्यालयाच्या बाजूला बांधण्यात आलेल्या मॉडर्न बसथांब्यामधील खुर्च्यांची झालेली मोडतोड, बसथांब्यातील खुर्च्यांवर बसून गुटखा खाऊन पिचकाऱया मारून रंगविलेल्या भिंती, यामुळे तेथे अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली आहे. त्याचा बंदोबस्त करण्यास ग्रा. पं. व पीडीओ अयशस्वी ठरल्यामुळे प्रवासी व नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. गुटखा खाऊन भिंतीवर थुंकणाऱया व रिकामटेकडय़ा नागरिकांना तेथे बसण्यास ग्रा. पं.ने मज्जाव करावा व परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे. याची त्वरित अंमलबजावणी न केल्यास ग्रा. पं. वर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
शासनाने कंग्राळी बुद्रुकचा स्मार्ट व्हिलेज योजनेमध्ये समाविष्ट केला आहे. ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये कंग्राळी बुदुक व गौंडवाड ही दोन्ही गावे आहेत. स्मार्ट व्हिलेज फंडातून दोन्ही गावचा विकास बऱयापैकी झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रवासी व विद्यार्थी वर्गाचे ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे व गावच्या विकासात आणखी भर पडावी म्हणून कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड येथे दोन मॉडर्न बसथांबे उभारले आहेत. परंतु बसथांब्यांचे उद्घाटन झालेल्या सहा महिन्यातच समाजकंटकांनी स्टील खुर्च्यांची मोडताड केली. रंगरंगोटी केलेल्या भिंतींवर गुटखा खाऊन पिचकाऱया मारून त्या रंगवल्या आहेत. त्यामुळे बसथांबा अस्वच्छ झाला आहे. बाजूने ये-जा करतानाही गुटख्याचा वास येत आहे.
याबाबत तरुण भारत वृत्तपत्रातून बसथांब्यावरील खुर्च्यांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यासंदर्भात आवाज उठविला होता. परंतु ग्रा. पं. ने या समस्येकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. की कुणा समाजकंटकांना साधी समजसुद्धा दिली नाही. हे सर्वात मोठे गावचे दुर्दैव म्हणावे लागेल.
गौंडवाड गावचा आदर्श घ्या
गौंडवाड गावामध्ये मराठी प्राथमिक शाळेसमोर बांधलेला मॉडर्न बसथांबा अगदी सुशोभित आहे. तेथील नागरिक, युवक मंडळांनी आपल्या गावच्या विकासामध्ये भर घालणारा हा मॉडर्न बसथांबा आहे, असे समजून बसथांबा उत्कृष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
बसथांब्यामधील शासकीय मालमत्तेची मोडतोड, भिंतीवर पिचकाऱया मारून केलेली अस्वच्छता करणाऱयांवर लक्ष ठेऊन त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे, पण याबाबत दुर्लक्षच होत आहे.
समाजकंटकांना समज देण्याची गरज
नागरिकांची सोय व्हावी, नागरिकांना चांगली सुविधा मिळावी म्हणून शासनाने करोडो रुपये खर्चून गावचा विकास करण्यास प्रारंभ केला आहे. परंतु शासकीय मालमत्तेची जेव्हा नासधूस होते तेव्हा ग्रामपंचायत व शासकीय अधिकारी गप्पच बसतात, हे चुकीचे आहे. अशा समाजकंटकांना चांगली अद्दल घडविली तरच पुढे अशा घटना घडणार नाहीत, अशा प्रतिक्रिया स्वाभिमानी नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
ग्रा. पं., पीडीओ व संबंधित शासकीय अधिकाऱयांनी या समस्येकडे गांभीर्याने त्वरित लक्ष देवून बस थांब्यामधील खुर्च्यांची दुरुस्ती व रंगरंगोटी करून पूर्वीचे मॉडर्न बसथांब्याचे अस्तित्व टिकवून प्रवासी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.