भात पिकांसह सर्वंच पिकांचे खाऊन, तुडवून मोठय़ा प्रमाणात नुकसान : ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष ; बंदोबस्त करण्याची शेतकरी वर्गाची मागणी
कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुकसह परिसरातील शिवारामध्ये डुकरांच्या कळपाकडून भात पिकांबरोबर इतर पिके व जनावरांचा चारा असे शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. परंतु ग्राम पंचायत किंवा संबंधित अधिकारी या समस्येकडे कानाडोळा करत असल्यामुळेच डुकरे सोडण्याचे प्रकार डुक्कर मालकांकडून होत आहे. विनाखर्च अधिक उत्पन्न देणार हा व्यवसाय असल्याने डुक्कर मालकांचे अधिक फावले आहे. मात्र यामध्ये शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण उत्पन्न अधिक अशा डुकरे पालन व्यवसायामुळे शेतकऱयांचे मात्र मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
संबंधितांनी डुकर पकड मोहीम राबवून भात पिकांसह इतर पिकाचे संरक्षण करून दिलासा देण्याची मागणी शेतकऱयांतून होत आहे. बेळगाव शहरामध्ये समाविष्ट असणाऱया शाहूनगर, आझमनगर, वैभवनगर, कलमेश्वरनगर आदी नवीन उपनगरांची निर्मिती झाली. पूर्वी ही डुकरे बेळगाव शहरातील वस्तीमध्ये वास्तव करून होती. जसजशी कंग्राळी बुद्रुक गावच्या पूर्व, दक्षिण व उत्तर दिशेने नवीन उपनगरांची निर्मिती झाली. त्याचा गैरफायदा डुकर पालन व्यावसायिकांनी या परिसरामध्ये डुकरांचे कळप सोडून घेतला. गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी डुकरांच वावर गायमर्यादित होता. मात्र सध्या शेतकऱयांच्या भातपिकांमध्ये त्यांनी शिरकाव केल्याने त्यांच्याकडून तुडवून, खाऊन मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीला जबाबदार कोण ? अशा प्रतिक्रिया अनेक शेतकऱयांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केल्या.
हातातोंडाला आलेली पिके फस्त
यावषी पावसाने चांगली साथ दिल्याने भातपिके जोमात आहेत. भाताची पोसवन होऊन दाणे धरायला सुरुवात असतानाच गाव परिसरासह वैभवनगर, शाहूनगर, कलमेश्वरनगर आदी शेतीवडीत या डुकरांच्या कळपाकडून पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच भुईमूग शेंगासह जनावरांचा हिरवा चारा, मका, बाजरी याचेही नुकसान होत आहे.
पिंजर वळय़ांचेही बरेच नुकसान
जनावरांसाठी पावसाळय़ात लागणाऱया पिंजर गवताची व्यवस्था प्रत्येक शेतकऱयांच्या परसूमध्ये केली जाते. परसूमध्ये साठवणूक केलेल्या पिंजरामध्ये डुक्कर येऊन गेल्यास ते गवत खाण्यास जनावरे कचरत असतात. त्यावेळी चाऱयाचा प्रश्न उद्भवतो. याला जबाबदार कोण ? अशा तक्रारीही शेतकऱयांकडून ऐकावयास मिळत आहेत.
कडधान्य पिकांचे नुकसान
पावसाळय़ात भातपीक, तर हिवाळय़ात कडधान्य पिकाचेही नुकसान या त्यांच्याकडून होत असते. या त्रासामुळे परिसरात काही शेतकरी वर्गाने पावसाळी बटाटे लागवड, भुईमूग पेरणीसुद्धा बंद केली आहे. कारण बटाटे व भुईमूग उगवण होताच ही डुकरे पिके उपटून टाकून पिकाचा नाश करत आहेत.
रोग साथींना आमंत्रण
डुकरांचे कळप तुंबलेल्या गटारी, शेणखत खड्डे, कचरा कुंड आदी ठिकाणी राहत असतात. यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरते. तसेच एखादे डुकर मृत झाल्यास त्याची जर विल्हेवाट लावली नाही तर मेंदूज्वर व इतर जीवघेण्या साथींचा फैलाव होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे शासनाने अशा डुकर पालन व्यवसायावर निर्बंध घालण्याची मागणी होत आहे.
विना खर्च व्यवसाय
डुकर पालन व्यवसाय विना खर्च आहे. डुक्कर मालक डुकरांची पिल्ले गावोगावी सोडून घरबसल्या हा व्यवसाय करतात. या डुकरांना कुणी सांभाळायची गरजच नसते. ती आपोआप कुठं तरी खाऊन मोठी होतात. काही डुक्कर मालक गरजेनुसार येतात आणि हवी तेवढी घेऊन जातात. त्याचवेळी आणखी पिल्ले सोडतात. यावेळी परिसरातील नागरिकांना वाटते की डुक्कर पकडून घेऊन गेले. परंतु दुसरे दिवशी पाहिले तर डुकरांच्या संख्येत वाढ झालेले निदर्शनास येते. सध्या डुकरांची संख्या वाढल्याने त्यांचा आता शेतवडीत शिरकाव झाल्याने शेतकऱयांच्या चिंतेत भर पडली आहे. एकेका शेतकऱयाचे भातपीक तर भूईसपाट केले आहे.
प्रतिक्रिया
दरवर्षीच डुकरांकडून मोठे नुकसान
या डुकरांच्या कळपाकडून प्रत्येक वर्षी आमचे भातपीक, भुईमूग, पिंजर व हिरव्या चाऱयाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. यामुळे आमच्या जनावरांना चारा कुठून आणायचा? आम्ही पोटाला खायचे काय? तेव्हा या डुकरांचा त्वरित बंदोबस्त करून शासनाने आम्हाला न्याय द्यावा.
मारुती नागाप्पा पाटील-शेतकरी
आता डुकरांचा मोर्चा शिवारांकडे
पूर्वी गावानजीकच्या नवीन वसाहतीमध्ये राहणारी डुकरे आता शिवाराकडे वळल्यामुळे पावसाळय़ात उभे भातपीक, हिरवा चारा व उन्हाळय़ामध्ये कडधान्य पिकांचे या डुकरांकडून नुकसान होत आहे. शासनाने वेळीच डुक्कर पकड मोहीम राबविली नाही तर शहराच्या आजूबाजूला अनेक पिकांनी सजवलेले शिवारच दिसणार नाही. यामुळे शासनाने डुकरांचा त्वरित बंदोबस्त करावा.
शंकर पुंडलिक पाटील-शेतकरी
पीक संरक्षणासाठी शासन काय उपाययोजना करणार
वैभवनगर खालील बाजूला आमची शेती आहे. परंतु प्रत्येक वर्षी शेतातील पिकांचे डुकरांकडून नुकसान होत असते. प्रत्येक वर्षी वृत्तपत्रामधून डुकरांचा बंदोबस्त करा, शेतकऱयांना न्याय द्या अशा बातम्या छापून येतात. मात्र पुढे कारवाई होतच नाही. तेव्हा पीक संरक्षणासाठी शासन काय उपाययोजना करणार कधी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गणपत गोविंद निलजकर-शेतकरी
डुकरांकडून भाजीपाल्याचाही फडशा
माझी शाहूनगर, महानगरपालिका वसाहतीला लागून भात शेती आहे. या डुकरांकडून पावसाळय़ात भात शेतीचे तर उन्हाळय़ात भाजीपाल्याचे नुकसान होत असते. आम्ही या शेतीत भाजीपाला पिकवितो. परंतु ही डुकरे हातातोंडाला आलेल्या पिकांचा फडशा पाडत असतील तर शेती करायची कशी? व पोटाला खायचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मनोहर मोनाप्पा पाटील-शेतकरी