वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
येथील मरगाईनगर परिसरामध्ये स्मार्ट व्हिलेज फंड निधीतून बांधण्यात येत असलेले कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे कंग्राळी बुद्रुक उपकेंद्र कधी सुरू होणार, याकडे नागरिकांचे डोळे लागून राहिले आहेत. सध्या देशभर सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात जर हे प्राथमिक उपकेंद्र सुरू झाल्यास कंग्राळी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी मागणीही नागरिकांतून करण्यात येत आहे.
कंग्राळी बुद्रुक गावची लोकसंख्या सुमारे 25 हजारच्या घरात आहे. कंग्राळी बुद्रुक गाव कडोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेले आहे.
एखाद्या आजारी नागरिकाला कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राला जायचे म्हणजे प्रथम कंग्राळी गावाहून बसने कित्तूर चन्नम्मा बसस्टँडला जावे लागते. तेथून परत कडोली गावाकडे जाऊन कडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जायचे म्हणजे आजारी माणसाच्या आजारात पुन्हा वाढ होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. यामुळे गावातील अनेक रुग्ण कडोली प्राथमिक केंद्राकडे जाण्याचे टाळून खासगी रुग्णालयाकडे वळतात.
वेळोवेळी उपकेंद्राची मागणी
कंग्राळी गावच्या लोकसंख्येच्या मानाने गावामध्येच उपकेंद्र सुरू करावे, अशी ग्राम पंचायत व नागरिकांतून वेळोवेळी मागणी करण्यात येत होती. याची दखल घेऊन गेल्यावषी स्मार्ट व्हिलेज फंड निधीतून मरगाईनगर परिसरामध्ये या उपकेंद्राच्या बांधणी कामाला सुरुवात झाली. सध्या 40 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम शिल्लक आहे, असे पीडीओ जी. आय. बर्गी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
कोरोना काळात उपकेंद्राची गरज
सध्या देशावर कोरोना महामारीचे संकट ओढवलेले आहे. अनेक नागरिक वेळीच उपचारांअभावी मृत्युमुखी पडत आहेत. कंग्राळी बुद्रुक गावातील हे प्राथमिक उपकेंद्र सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. या भागाचे लोकप्रतिनिधी, ग्राम पंचायत व शासकीय अधिकाऱयांनी त्वरित प्राथमिक उपकेंद्र सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.