अनेक दुकानामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान : प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्यांचाही साचला होता खच
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
येथील परिसरामध्ये रविवार पहाटे पाच वाजता पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. ग्राम पंचायतीने उपनगरातील सांडपाण्याच्या गटारी चव्हाट गल्लीतील गटारीना जोडल्यामुळे आणि गटारीतील अति पाण्याचा निचरा होत नसल्याने चव्हाट गल्लीला नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे गल्लीतील अनेक दुकानामध्ये पाणी शिरून बरेच नुकसान झाले आहे. प्लास्टिक बाटल्या व पिशव्यांचे खचही पडल्याचे दिसून येत होते. रविवारी पहाटे पाच वाजता ढगफुटी सदृश मुसळधार पावसाने अचानक सुरुवात करून सर्वत्र पाणीच पाणी केले.
गावचे दुर्दैव
कंग्राळु बुद्रुक गावच्या पूर्व व दक्षिण दिशेला मरगाईनगर, पूर्वेला उपनगराबरोबर औद्योगिक वसाहत, उत्तरेला केएलई हॉस्पिटल, नेहरूनगर, आझमनगर, शाहूनगर आदी वसाहतींचे सर्व सांडपाणी तसेच पावसाचे लोंढे कंग्राळी बुद्रुक गावाकडेच येत आहेत. वरील वसाहतींचे सर्व पाणी गावाकडे येऊन नाला व कालव्याद्वारे मार्कंडेय नदीमध्ये मिसळत आहे. ते अति पाणी शिवारात जात असल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान होत
आहे.
पाणी त्यावेळीच अडविणे गरजेचे होते
पूर्वेकडील औद्योगिक वसाहत, केएलई हॉस्पिटल, नेहरुनगर, आझमनगर, शाहूनगर आदी वसाहतींचे सांडपाणी कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतने त्यावेळी अडविणे गरजेचे होते. पण तसे न केल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याला जेवढी ग्राम पंचायत जबाबदार आहे. तेवढेच नागरिक सुद्धा जबाबदार असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत
आहे.
लक्ष्मी गल्लीतील रहिवाशांना दिलासा द्या गावचे सांडपाणी सुद्धा चव्हाट गल्लीला न जोडता दुसऱया बाजूने वळविले असते तर पाणी लक्ष्मी गल्लीतून गेले नसते. तेव्हा ग्राम पंचायतीने अजून गावचे सांडपाणी गटारीद्वारेच दुसऱया बाजूकडे वळविल्यास चव्हाट गल्लीमार्गे लक्ष्मी गल्लीकडे येणारा पाण्याचा मोठा लोंढा कमी होऊन येथील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी गल्लीतील रहिवाशांतून व्यक्त होताना दिसत आहेत.