वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, दिल्ली येथून कंग्राळी बुदुक येथे आलेल्या 9 जणांना ग्राम पंचायतच्या नवीन इमारतीमध्ये क्वारंटाईन केल्याची माहिती तरुण भारतशी बोलताना ग्रा. पं. अध्यक्ष दत्ता पाटील यांनी दिली.
यामध्ये महाराष्ट्रातील सांगली, सातारा, रत्नागिरी व पुणे येथील 5 जणांचा समावेश आहे. आंध्रप्रदेश येथून 2 जण दिल्ली येथून तर गोवा येथून 1 असे एकूण 9 जणांना कोरोनाबाबत खबरदारी म्हणून क्वारंटाईन केल्याचे संगण्यात आले.
यामध्ये दिल्ली येथून आलेला जवान आहे तर सातारा येथून आलेला गवंडी कामगार आहे. तर बाकीचे खासगी नोकरी करणारे आहेत. क्वारंटाईन केलेल्यांना ग्राम पंचायतीतर्फे जेवण देण्यात येत आहे. यापूर्वी कोरोनाचा संसर्ग फैलाव होऊ नये यासाठी गरजूंना मास्क, रेशनचे वाटप, जंतूनाशक फवारणी करणे असे उपक्रम ग्राम पंचायततर्फे राबविले आहेत.
क्वारंटाईन करतेवेळी ग्राम पंचायत अध्यक्ष दत्ता पाटील, पीडीओ जी. आय. बर्गी, सेक्रेटरी सुनंदा एन., तलाठी सुरेश शिंत्रे, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, दादासाहेब भदरगडे, कल्लाप्पा जाधव, प्रदीप पाटील, सदस्या शितल पावशे, सुजाता जठार, प्राथमिक आरोग्य केंद्र कडोलीच्या आरोग्य सहाय्यिका वर्षा घोडके, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका आदी उपस्थित होत्या..