शेतकरी व ग्रा. पं. सदस्यांची पाटबंधारे खात्याकडे मागणी
वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गावच्या पश्चिमेकडून वाहणाऱया मार्कंडेय नदीकाठावर आमदार सतीश जारकीहोळी यांच्या फंडातून गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या तलाव भरणी लिफ्ट एरिगेशन योजनेचे पाणी कंग्राळी बुद्रुक येथील भातशेती शिवाराला सोडून शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्यावतीने पाटबंधारे कार्यालयामध्ये अधिकारी माळगी यांना नुकतेच देण्यात आले.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. दीड महिन्यापूर्वी पावसाने चांगली साथ दिली होती. यामुळे भातपिके चांगली आली आहेत. कायमच हा शिवार पावसाच्या पाण्यावर पिकणारा आहे. यापूर्वीची लिफ्ट एरिगेशन योजना कुचकामी ठरल्यामुळे आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या फंडातून गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, काकती भागातील तलाव भरणे व उर्वरित वेळेत भातशेतीला पाणी सोडणे, या उद्देशाने मार्कंडेय नदीकाठावर दुसरी नवीन लिफ्ट एरिगेशन योजना करून शेतकरीवर्गाला दिलासा देण्याचे काम केले आहे. परंतु कंग्राळी बुद्रुक गावासाठी ही योजनासुद्धा कुचकामी ठरली आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने भातपिकाला पाण्याची नितांत गरज आहे. तेव्हा ही योजना त्वरित सुरू करून शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष अनिल पावशे, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, यल्लोजी पाटील, तानाजी पाटील, नवनाथ पुजारी, उमेश पाटील, बाबू दोडमनी, शंकर कोनेरी, प्रशांत पवारसह ग्रामस्थ उपस्थित होते.