प्रतिनिधी / कोल्हापूर
कंत्राटी वीज कर्मचाऱयांनी विविध प्रलंबित मागण्यांबाबत वीज कंपनी प्रशासन व शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केले आहेत. आंदोलन करून निवेदने दिली आहेत. पण त्याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेच्यावतीने चार टप्प्यात आंदोलन केले जात आहे. यामधील चौथ्या टप्प्यात सोमवारपासून (7 जुलै) तीन्ही वीज कंपन्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत. सोमवारी दुपारी महावितरणच्या ताराबाई पार्क येथील परिमंडल कार्यालयासमोर सर्व कंत्राटी कर्मचाऱयांनी एकत्र येवून शासन आणि प्रशासनाचा निषेध करणार असल्याची माहिती अमर लोहार यांनी दिली.
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील हजारो वीज कंत्राटी कामगारांनी अनेक नैसर्गिक आपत्तीमध्येही वीज पुरवठा अखंडीत ठेवला आहे. ही सेवा बजावात असताना 8 कंत्राटी कर्मचारी दगावले. तर 12 कामगार गंभीर जखमी झाले. पण या कामगारांना वेळेवर किमान वेतनासह दिवाळीचा बोनसदेखील मिळालेला नाही. सॅनिटायझरसाठी मंजूर 1 हजार रूपयांचे अनुदान अनेकांना मिळालेले नाही. याऊलट ठेकेदारांनी कंत्राटी कर्मचाऱयांच्या पगारातून हजारो रूपये अनिधिकृत काढून घेतात. याबाबत तक्रार देणाऱया कर्मचाऱयांना कामावरून बंद केले जाते. कोरोना महामारीच्या काळात वीज कंपन्या अथवा ठेकेदारांनी सुरक्षिततेची कोणतीही साधने दिलेली नाही. अपघात झाल्यास अर्थिक मदतीची तरतूद नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱयांनी चार टप्प्यात आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात सोमवारी (15 जून) काळ्या फिती लावून आंदोलन केले. दुसऱया टप्प्यात 25 जून रोजी काळ्या फिती लावून निषेध फलक हाती घेवून आंदोलन केले. तर चौथ्या टप्प्यात 7 जुलै रोजीपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले जाणार आहे.