– कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाचा उपक्रम
– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क, सोशल डिस्टंन्सिंग कारवाई : कर्मचाऱयांना मिळाले काम व मानधन
– मनपा तिजोरीत दररोज होतोय हजारो रुपयांचा दंड जमा
नंदकुमार तेली/कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क, सोशल डिस्टंन्सिग, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आदी कारवाईची मोहिम राबविण्यात येत आहे. यातून मनपाच्या तिजोरीत हजारो रुपयांचा दंड जमा होत आहे. या उपक्रमामुळे कंत्राटी 200 कर्मचाऱयांना काम मिळाले असून मानधनातून आर्थिक हातभार लाभला आहे.
एका दिवसात 37 हजारांचा दंड जमा
शनिवारी (दि.14) एका दिवसात शहरातील विना मास्क, सोशल डिस्टंन्सिग व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आदी कारवाईतून सुमारे 37 हजारांचा दंड मनपाच्या तिजोरीत जमा करण्यात आला होता. तर रविवारी सकाळी 8 ते दुपारी 3 यावेळेत सुमारे 27 हजारांचा दंड जमा करण्यात आला होता. ही मोहिम शहरातील विविध ठिकाणच्या प्रमुख चौकांमध्ये राबविण्यात येत आहे. मोहिम सकाळी 8ते दुपारी 3 व दुपारी 3 ते रात्री 9 या काळात राबविण्यात येते.
शहरात एकुण 18 पथके कार्यरत
शहरातील प्रमुख मार्ग व चौकांमध्ये एकुण 18 पथके कार्यरत असून प्रत्येक पथकात 3 कंत्राटी कर्मचाऱयांचा समावेश आहे. सकाळच्या सत्रात सुमारे 54 व दुपारच्या सत्रात 54 असे एकुण सुमारे 100 पेक्षा अधिक कर्मचारी अविरत कार्यरत आहेत. हे कर्मचारी कोरोना काळात अल्प अशा मानधनावर आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्यासाठी जनजागृती मोहिम राबवत आहेत.
कोरानाच्या पार्श्वभूमीवर परिवहनचा उपक्रम
कारोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन लागू करण्यात आले होते. याकाळात परिवहन विभागाच्या सर्व बसेस बंद करण्यात आल्याने कर्मचाऱयांना बेरोजगारीची वेळ आली होती. सध्या काही मार्गावरील बस सुरू असल्या तरीही प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद लाभत नाही. गेल्या सात महिन्यांपूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी परिवहन विभागातर्फे जनजागृती माहिम राबविण्याचा निर्णय घेतला. यामुळे कंत्राटी कर्मचाऱयांना रोजगार उपलब्ध झाला. तसेच मनपाच्या तिजोरीत दररोज हजारो रुपयांचा दंडाच्या रुपाने महसूल जमा झाल्याने कर्मचाऱयांना आर्थिक हातभार लावण्यास मदत झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य केंद्र असून केंद्र प्रमुख बी.बी.चंदन यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सध्या 18 पथके कारोनाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रणासाठी जनजागृती करण्यात अविरत कार्यरत आहेत.