पहिल्या पेटीला 25 हजाराचा दर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणातील आंबा बागायतदार प्रतिकूल वातावरणाशी झगडतोय. येथील स्वावलंबी शेतकऱयांना देश-विदेशातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध व्हावी म्हणून विविध पर्याय उपलब्ध झालेत. आता तर मार्केटींग कंपन्यांना थेट आंबा बागेत बोलावून त्याच ठिकाणी हापूसचा लिलाव करण्यावर रत्नागिरीत अमृता मँगोजने भर दिला आहे. पावस येथे या हंगामातील तोडणी केलेल्या हापूसच्या पहिल्या पेटीच्या लिलावाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी सहा डझनाच्या पेटीला तब्बल 25 हजाराची बोली उरणच्या आशुतोष काळे यांच्याकडून लाभली.
रत्नागिरीत अशाप्रकारे आंबा बागेमध्ये मार्केटींग कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे. देशविदेशातील चोखंदळ खवय्यांना पूर्णतः नैसर्गिक पध्दतीने पिकवलेल्या हापूस आंब्याची गोडी चाखता यावी यासाठी विविध पर्याय चोखालले जात आहेत. कोकणातील अस्सल हापूस मोठय़ा प्रमाणात निर्यात होत आहे. त्याला अलिकडे ‘जिआय’ मानांकनही लाभलेले आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांकडून दर्जेदार हापूसचे उत्पादन घेण्यावर भर दिला जात आहे.
अलिकडे बागायतदाराला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही पावस येथील आंबा बागेत अभिजित पाटील यांच्यातर्फे आंबा पेटीच्या पहिल्या लिलावाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ही लिलाव प्रक्रिया त्यांनी शुक्रवार 11 फेब्रुवारी थेट बागेतच घेण्याचा शुभारंभ केला. त्यासाठी मुंबईसह इचलकरंजी, पुणे येधील सहा मार्केटींग व्यावसायिक प्रत्यक्ष सहभागी झाले होते. प्रक्रिया चालू करण्यापुर्वी पाटील कुटुंबियांनी पहिल्या हापूस पेटीचे पूजन केले. यावेळी अभिजित यांचे वडील, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, कर्नल आशुतोष काळे, उद्योजक नवीन राजपाल, बागायतदार सखाराम आग्रे, पराशर मोकल, रवींद्र कुलकर्णी, जयवंत कोळी यांच्यासह बागेचे व्यवस्थापक माजी कृषी अधिकारी संदिप डोंगरे उपस्थित होते. मुहूर्ताच्या 12 डझनाच्या आंबा विक्रीचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
या लिलावामध्ये पहिल्या सहा डझनच्या एका पेटीला संदीप डोंगरे यांनी बोली लावली. त्या पेटीची मुळ रक्कम 18 हजार रुपये ठेवण्यात आली होती. 18 हजारापासून लागेलेल्या बोलीत पेटीला 25 हजार रुपयांपर्यंत अखेरचा दर मिळाला. उरणचे कर्नल आशुतोष काळे यांनी या पहिल्या पेटीला हा दर दिला.
पावस येथील आंबा बागेचे व्यवस्थापन कृषीतज्ञ संदीप डोंगरे यांनी केले. फेब्वारीच्या दुसऱया आठवडय़ात हापूस बाजारात आणण्यासाठी ते गेले सहा महिने प्रयत्न करत होते. डाग विरहीत आंबा अशी ओळख निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला आहे. येत्या चार दिवसात अजून 20 पेटी आंबे बाजारात आणणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.
..
उत्पादन खर्चात कपातीसाठी प्रयत्न
मार्केटमध्ये कर्नाटकी आंबा भेसळ करत असल्यामुळे हापूसला अपेक्षित दर मिळत नाही. बाजार समितीमध्येही तीच स्थिती असून त्यामुळे रत्नागिरी, देवगडचा हापूस थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी विविध कंपन्या, विक्रेत्यांना बागेत आणण्यात येणार आहे. पावस येथील बागेत भविष्यात बागांचे व्यवस्थापन करताना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
– अभिजित पाटील,
आंबा बागायतदार शेतकरी
लिलावातील हापूसची पहिली पेटी पाठवणार टोरंटो मध्ये
पावस येथील आंबा लिलावात सैन्यातून निवृत्त झालेले कर्नल आशुतोष काळे यांनी पहिली पेटी विकत घेतली. ही हापूसची पेटी टोरंटोमध्ये असलेल्या आपल्या मुलीला पाठवणार असल्याचे काळे यांनी सांगितले. रत्नागिरी हापूस देशाच्या व जगाच्या कानाकोपऱयात जाणे आंतरराष्ट्रीयस्तरावर हापूसचा प्रचार होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.