खानापूर / प्रतिनिधी
कक्केरी (ता. खानापूर) येथे भाताची मळणी करणाऱया शेतकऱयाचा भीषण खून झाल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे. सदर शेतकऱयाचे नाव बिस्टप्पा परसप्पा कोनसगुंपी (वय 43) असे आहे.
बिस्टप्पाने आपल्या शेतामध्ये भाताची मळणी घातली होती. मळणी करून कामगारवर्ग सायंकाळी घरी परतला होता. रात्री बिस्टप्पा भाताच्या राशीशेजारी झोपला होता. त्यावेळी बिस्टप्पाच्या डोकीत वार करून त्याचा भीषण खून करण्यात आला आहे. सकाळी बिस्टप्पाच्या पत्नी व मुलाने येऊन पाहिले असता बिस्टप्पा रक्ताच्या थारोळय़ात पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती तातडीने नंदगड पोलिसांना देण्यात आली. खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, नंदगडचे पीएसआय उस्मान अवटी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर बिस्टप्पाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. बिस्टप्पाचा खून नेमका कुणी केला, याबद्दल कक्केरी परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. यासंदर्भात बिस्टप्पाच्या भावाने नंदगड पोलीस स्थानकात पिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी तपासाची चक्रे जोरात सुरू केली आहेत. या घटनेमुळे कक्केरी परिसरात खळबळ माजली आहे. बिस्टप्पाच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. बैलहोंगल विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप गुंटी यांनी घटनास्थळाला भेट देऊन चौकशी केली.