आमदार न आल्याने अनेकांचा हिरमोड : वाहन वितरण कार्यक्रम पुन्हा लांबणीवर
प्रतिनिधी /बेळगाव
सरकारकडून ग्राम पंचायतींना कचरावाहू वाहन मंजूर झाले आहे. मात्र त्याचा वितरण सोहळा अद्यापही झाला नाही. परिणामी बुधवारी हा सोहळा होणार होता. यासाठी तालुका पंचायतसमोर ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व पीडीओंनी भाऊगर्दी केली होती. मात्र आमदार न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला. परिणामी पुन्हा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तालुक्मयातील कचरा निर्मूलनासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी छोटेखानी कचरा डेपो उभारण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तर काही ठिकाणी कचरा विघटनासाठीही ग्राम पंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. नुकताच तालुका पंचायत व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कचरा उचल करण्यासाठी कुटुंबाला एक बकेट देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता कचरा उचलण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली तरी त्याचा वितरण सोहळा अद्यापही झाला नाही. त्यामुळे ग्राम पंचायत सदस्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी यासंबंधी सुमारे 15 ग्राम पंचायतींना वाहने देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. यासाठी तालुका पंचायतमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व अधिकारी तालुका पंचायतकडे दाखल झाले होते. अनेकांनी तर वाहनांची पूजाही केली. मात्र आमदार न आल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. घरोघरी जाऊन कचरा उचल करण्यासाठी 40 ग्राम पंचायतींना वाहने मिळणार आहेत. मात्र त्या त्या कार्यक्षेत्रातील आमदारांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच ही वाहने ग्रा. पं.कडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. यासंबंधी बुधवारी आमदार गैरहजर राहिल्याने हा वितरण सोहळा पुन्हा पुढे ढकलण्यात आला.
बेळगाव ता. पं.च्या कार्यक्षेत्रात एकूण 57 ग्राम पंचायती आहेत. यापैकी आता 40 ग्राम पंचायतींना वाहने देण्यात येणार आहेत. तर उर्वरित 17 ग्राम पंचायतींनाही वाहने उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हा पंचायतीकडे विनंती अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित ग्राम पंचायतींनाही तातडीने कचरा उचल वाहनांची व्यवस्था होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र वितरण सोहळा होत नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. याबाबत तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला.