भाग्यदिपचे भाग्य उजळणार की आणखी कोणाला संधी मिळणार
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील कचरा गोळा करुन तो पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत टाकयण्याचे टेंडर प्रक्रिया नुकतीच राबवण्यात आली. त्याच्या निविदा मंगळवारी फोडल्या असून कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. त्यामुळे नेमके टेंडर कोणाला जाणारा भाग्यदीपचे भाग्य उजळणार की आणखी दुसरा कोणता ठेकेदार येणार याकडे सगळय़ांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, शहरातील बागांची देखभाल करणाऱया निसर्ग या कंपनीकडून काम व्यवस्थीत होत नसल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱयांनीच प्रत्यक्ष पाहिली त्यामुळे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी निसर्ग कंपनीच्या व्यवस्थापकास चांगलेच खडे बोल सुनावले.
सातारा शहरातील कचरा गोळा करुन तो सोनगाव कचरा डेपोत टाकण्याकरता असलेल्या कचरा गाडय़ांवर नियंत्रण व व्यवस्थापन ठेवण्याकरता ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येते. ठेकेदाराची मुदत संपल्याने नव्याने टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्याकरता पाच ठेकेदारांनी सहभाग नोंदवला आहे. मंगळवारी याचा लाखोटा खोलला आहे. त्यामध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांची कागदपत्रे पडताळणी सुरु आहे. कोणी कमी बोली लावली आहे कोणाला हा ठेका दिला गेला आहे हे अद्याप जाहीर झाले नाही. तत्पूर्वी गतवर्षीच्या ठेकेदार होता त्या ठेकेदारालाच परत ठेका देण्याच्या खटपटी सुरु असून त्याचे भाग्य उजळणार की त्या कंपनीच्या नावाने कोण कोण हात ओले करणार याचीच चर्चा सुरु आहे. येत्या दोन दिवसात तो ठेका कोणाला देण्यात आला हे स्पष्ट होणार आहे.
मुख्याधिकाऱयांनी निसर्गच्या व्यवस्थापकास सुनालवले खडेबोल
शहरातील बागांची देखभाल करण्यासाठी सातारा पालिकेने दर महिन्याला सात लाख रुपयांचे काम निसर्ग या कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून योग्य पद्धतीने काम होत नसल्याची बाब चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही बाब मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या कानावर घालताच त्यांनी निसर्गच्या व्यवस्थापकास बोलवून घेवून काम चांगले करायचे नाहीतर दिलेली मुदतवाढ रद्द केली जाईल, अशा शब्दात ठणकावून सांगितले. त्यामुळे तेवढय़ावर निसर्ग कंपनी सुधारणार का? असाही सवाल उपस्थित होत आहेत.
निसर्गबाबत झाली लेखी तक्रार
शहरातील पालिकेमार्फत बांगाची देखभाल करणे, झाडांची निगा राखणे हे काम निसर्ग लॅण्ड स्केच या कंपनीला देण्यात आली आहे. या ठेकेदाराकडून 8 कर्मचाऱयांकरवी काम केले जात आहे. बांगामधील लॉन जळून गेले आहे. झाडांना पाणी नसल्याने झाडे सुकली आहेत. त्या ठेकेदाराची चौकशी करुन त्याचा ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी केलेली आहे.