प्रतिनिधी / कोल्हापूर
कदमवाडी परिसरामध्ये टिपर वाहनातून घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या विजय गणेश अवघडे (वय -३२, रा. राजारामपुरी, पाचवी गल्ली) याला किरकोळ कारणावरून परिसरातील एका कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर शहरामध्ये कचरा गोळा करणाऱ्या टिपर चालकांनी सीपीआर व दसरा चौक परिसरात काम बंद आंदोलन करून निदर्शने केली. मारहाण करणाऱ्या संशयितांना तात्काळ अटक केल्याखेरीज काम सुरू करणार नाही अशी भूमिका टिपर चालकांनी घेतल्याने शाहुपूरी पोलिसांनी अखेर संशयिताना ताब्यात घेतले.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी, कोल्हापूर महानगरपालिकेने गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून शहरातील कचरा गोळा करण्यासाठी टिपर वाहनांची खरेदी केली आहे. कचरा गोळा करण्यासाठी डीएम एंटरप्राइजेस कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.या कंपनीने १०४ चालक नेमले आहेत. त्यामुळेच शहरातील कचरा उठाव व्यवस्थित होतो. शुक्रवारी सकाळी कदमवाडी परिसरामध्ये विजय आवघडे हे टिप्पर गाडी घेऊन कचरा गोळा करण्याचे काम करीत होते. दरम्यान या परिसरातील एका घरासमोर टिप्पर वाहन मागे घेत असताना दुचाकीला धडक लागून संबंधित घरातील युवती रस्त्यावर पडून जखमी झाली. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबीयांनी टिप्पर चालक अवघडे याला याबाबत जाब विचारला.
रागाच्याभरात त्या कुटुंबियांनी अवघडे याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच घरात नेऊन देखील मारहाण केल्याने अवघडे यांच्या हाताला गंभीर इजा झाली. यावेळी अवघडे यांना वाचवण्यासाठी गेलेल्या साजन माजगावकर यांनाही मारहाण झाली. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. जखमी अवघडे यांना तात्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शहरातील इतर टिपर चालकांनी कामबंद आंदोलन करून दसरा चौकात वाहने लावली. तसेच सीपीआर परिसरामध्ये निदर्शने केली. पोलिसांनी आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांना तात्काळ अटक केल्याखेरीज काम सुरू करणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली.
डीएम इंटरप्राईजेसचे सुपरवायझर आकाश माने व आशूतोष जाधव यांच्यासह सर्वच टिपर चालक शाहुपूरी पोलीस ठाण्यात गेले. संशयितांना अटक केल्याखेरीज काम सुरू करणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगून नागरिकांचा खोळंबा न करता काम सुरू करण्याची विनंती केली. त्यानंतर मात्र कर्मचारी कामावर रुजू झाले.