स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत प्रस्ताव : 31 डिसेंबरपर्यंत नागरिकांना आपल्या प्रकल्पाची संकल्पना महापालिकेकडे सादर करता येणार
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास करण्यात आला आहे. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन अपुरे पडत आहे. कचऱयाची समस्या भेडसावत असल्याने या समस्येचे निवारण करण्याच्या दृष्टीने कचऱयाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. याकरिता सुशिक्षित युवक आणि नागरिकांच्या आयडिया जाणून घेण्यात येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत कचरा विल्हेवारीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
शहरातील कचऱयाची समस्या महापालिका आणि प्रशासनासाठी डोकेदुखीची बनली आहे. स्वच्छ शहर बनविण्यासाठी महापालिकेकडून अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांना काहीअंशी यश आले आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे आणि व्यापारीकरणामुळे कचऱयाचे प्रमाण वाढत आहे. कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून कोटय़वधी निधी खर्च केला जातो. मात्र स्वच्छता म्हणावी तशी होत नाही. परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण होत नाही. त्यामुळे लोककल्पनेतूनच स्वच्छतेचे आणि कचरा विल्हेवारीचा प्रकल्प राबविण्याचा विचार प्रशासनाने चालविला आहे. याकरिता स्वच्छता तंत्रज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वच्छता आणि कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सूचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. 31 डिसेंबरपर्यंत नागरिकांनी आपल्या प्रकल्पाची संकल्पना महापालिकेकडे सादर करावी, असे आवाहन केले आहे.
स्टार्टअप इंडियांतर्गत मदत करण्यात येणार
आजच्या तरुण मंडळींकडे अनेक कल्पना आहेत. त्याअंतर्गत स्वच्छता आणि कचरा विल्हेवारीसाठी प्रकल्प तयार केल्यास त्याची माहिती महापालिकेकडे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चार मुद्दय़ांवर हे प्रकल्प राबविणे आवश्यक असून यामध्ये समाजाचा सहभाग असणे बंधनकारक आहे. रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा बंद झाला पाहिजे. प्लास्टिक कचऱयाची विल्हेवाट आणि पारदर्शीपणा या प्रकल्पात राहणे आवश्यक आहे. स्टार्टअप इंडिया अशा योजनेंतर्गत प्रकल्प राबविण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. त्यामुळे दि. 31 डिसेंबरपर्यंत कचरा विल्हेवारी प्रकल्पाची माहिती महापालिकेकडे सादर करावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.