गटारींची स्वच्छताही अर्धवट
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील गटारी स्वच्छ करून कचरा हटविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. मात्र ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी पाटील गल्ली येथील उषाताई गोगटे शाळेसमोर गटारीमधील कचरा आणि गाळ गेल्या पंधरा दिवसांपासून पडून आहे. काढलेला गाळ पुन्हा गटारीत पडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
सातत्याने तक्रारी केल्यानंतर पाटील गल्ली येथील उषाताई गोगटे शाळेसमोरील गटारीमधील कचरा काढण्यात आला. गटारीमधील काढण्यात आलेला कचरा आणि गाळ हटविण्याची गरज होती. पण रस्त्यावर गटारीच्या काठावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा आणि गाळाचे ढिगारे साचले आहेत.
कचरा काढून आठ दिवस झाले पण उचल करण्यात आली नाही. परिणामी काढण्यात आलेला कचरा पुन्हा गटारीत पडत आहे. त्यामुळे गटारी कचऱयाने भरल्या आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच वाहनांमुळे हा कचरा रस्त्यावर पसरत आहे. शाळेमध्ये ये-जा करणाऱया विद्यार्थ्यांसह परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील गटारी व्यवस्थित स्वच्छ करण्यात आल्या नसल्याने महापालिकेने राबविलेली मोहीम वाया गेली असल्याची टीका नागरिक करीत आहेत. येथील गटारी स्वच्छ करण्यासह कचऱयाची उचल तातडीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.