प्रतिनिधी / बेळगाव
कचेरी गल्ली, शहापूर येथे मुख्य जलवाहिनीला गळती लागून दीड महिना उलटला तरी पाणीपुरवठा मंडळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पाणीपुरवठा मंडळाच्या गलथान कारभारचा फटका येथील नागरिकांना बसू लागला आहे. दररोज शेकडो लीटर पाणी वाया जात असूनही त्याची दखल मात्र कोणीच घेताना दिसत नाही. या सर्व कारभाराबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
बनशंकरी मंदिरासमोरच मागील दीड महिन्यापूर्वी जलवाहिनीला गळती लागली आहे. यामुळे शेकडो लीटर पाणी रस्त्यावरून वाया जात आहे. मंदिरासमोरच पाणी साचत असल्याने येणाऱया भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येणाऱया-जाणाऱया वाहनांमुळे पाणी आजूबाजूच्या घरांवर उडत आहे. मुख्य जलवाहिनीला गळती असूनही ती अद्याप काढण्यात आलेली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठा मंडळाचा गलथान कारभार
जलवाहिनीला गळती लागली असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाला देण्यात आली असतानाही त्यांच्याकडून कानाडोळा केला जात आहे. एकिकडे एप्रिल महिना सुरू झाल्याने पाण्याचा जपून वापर करा, असे आवाहन केले जात असताना दुसरीकडे मात्र पाणीपुरवठा मंडळाकडूनच पाणी वाया घालविले जात आहे. ही गळती लवकर करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.