गायी म्हशी असणार्यांकडे दूधदुभत्याची रेलचेल असते. त्यामुळे गायीचे दूध काढले की निरसे म्हणजे कच्चे, धारोष्ण दूध प्यायले जायते. या कच्च्या म्हणजे निरश्या दुधाचे अनेक फायदे असतात. परंतु या प्राण्यांच्या आचळांतून दूध काढताना जर स्वच्छतेकडे, साफसफाईकडे दुर्लक्ष झाले असेल तर अशा निरशा दुधाचे सेवन केल्याने ब्रुसेलोसिस नावाचा आजार होऊ शकतो.
जीनस ब्रुसेला या जीवाणू समूहाच्या माध्यमातून हा आजार पसरतो. हा आजार प्राणघातक नाही. पण या विकाराचा संसर्ग झालेल्या मातेकडून स्तनपानाच्या माध्यमातून बालकामध्ये शिरकाव करू शकतो. या आजाराची लक्षणे ही स्वाईन फ्लू प्रमाणे आहेत. भूक न लागणे, थंडी वाजून ताप येणे, पाठदुखी, सुस्तपणा, चक्कर येणे. डोकेदुखी, पोटदुखी, सांधेदुखी आणि वजन सातत्याने घटणे ही लक्षणे यामध्ये दिसून येतात.
आरोग्य तज्ञांच्या मते ज्या जनावराचे दूध काढले जाते ते स्वतः निरोगी असणे गरजेचे असते. दूध काढताना स्वच्छतेकडे संपूर्ण लक्ष दिल्यास काहीच अडचण येणार नाही.
दूध दुषित होण्यास जनावरांच्या विष्ठेचा संपर्क येणे हेही एक कारण असू शकते. अशा दुधाचे सेवन केलेल्या व्यक्तींना अनेक आजारांना तोंड द्यावे लागू शकते.
दुषित नीरसे दूध प्यायल्यास पोटाच्या खालच्या बाजूला तीव्र वेदना होण्याची जुलाब आणि उलटय़ा होण्याची शक्यता असते. लक्षणे खूप जास्त वाढली तर अधिक त्रास होऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीने दीर्घ काळ अशा दुषित दुधाचे सेवन केल्यास त्याला पॅरालिसिससारखा आजार होऊ शकतो. अर्थात अशी शक्यता खूपच कमी असते.
यावर उपाय म्हणजे दूध योग्य पद्धतीने उकळून घेऊन मगच त्याचे सेवन करावे. कारण उकळण्याच्या प्रक्रियेत दुधातील बहुतांश विषाणू आणि जीवाणू मरतात.
तथापि, एक मतप्रवाह असा देखील आहे की दूध तापवल्याने त्याची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे स्वच्छतेची योग्य काळजी घेऊन दूध काढले असेल तर कच्चे दूध हे उकळलेल्या दुधापेक्षा अधिक पौष्टिक असते.
पौष्टिक घटकांचा फायदा मिळण्यासाठी दूध दोन दिवसांतच वापरणे आवश्यक असते.