प्रतिनिधी/ वडूज
कटगुण (ता. खटाव) येथील एका पोल्ट्री फार्मवरील साडेचारशे देशी कोंबडय़ा अचानक दगावल्या आहेत. बर्ड फ्लु आजाराच्या पार्श्वभूमीवर या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱयांनी या कोंबडय़ांची तपासणी करुन रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. प्रयोगशाळेच्या निष्कषानंतरच पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, कटगुण-खटाव रस्त्यानजीक अमर गोरे यांची शेती व पोल्ट्री शेड आहे. ते स्वतः सुशिक्षीत बेरोजगार आहेत. शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून त्यांनी सहा महिन्यापूर्वी मुंबईहून देशी कोंबडय़ांची 500 पिल्ले आणली होती. या पिल्लांची तीन महिन्यानंतर चांगली वाढ झाली होती. शुक्रवारी रात्रीच्या वेळी अचानक यापैकी 450 कोंबडय़ांचा मृत्यु झाला आहे. यापैकी काही कोंबडय़ांना हिस्त्र पशुने चावा घेतल्याचे प्रथमदर्शनी जाणवते. त्यामुळे इतर कोंबडय़ांचा घबराटीने अथवा हार्ट अटॅकने मृत्यु झाला असावा असा तर्क व्यक्त होत आहे. वडूज येथील तालुका लघु सर्व पशुचिकित्सालयाचे डॉ. नितीन खाडे, बुधचे डॉ. विश्वास इनामदार, सिध्देश्वर कुरोलीचे डॉ. प्रकाश बोराटे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट देवून मृत कोंबडय़ांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. सदरचे नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले आहेत. प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान आपद्ग्रस्त शेतकऱयाला शासनामार्फत तातडीची मदत देण्याची मागणी होत आहे.