भाजप खासदार लॉकेट चटर्जी यांचे विधान
बंगाल विधानसभा निवडणुकीच्या 8 टप्प्यांमधील मतदानानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजप दोघेही स्वतःच्या विजयाचा दावा करत आहेत. वीरभूम जिल्हय़ातील उमेदवारासाठी प्रचार करताना भाजप महासचिव आणि लोकसभा खासदार लॉकेट चटर्जी यांनी विजयाचा दावा करत 2 मेनंतर सीबीआय लोकांकडून घेण्यात आलेल्या कटमनीचा हिशेब करणार असल्याचे म्हटले आहे.
वीरभूम येथील रामपुरहाट येथील भाजप उमेदवार निखिल बॅनर्जी यांच्या प्रचाराकरता आयोजित सभेला त्यांनी संबोधित केले होते. 2 मेनंतर राज्यात भाजपचे सरकार आल्यावर जनतेकडून विविध योजनांकरता घेण्यात आलेल्या कटमनीचा हिशेब तृणमूल काँग्रेस नेत्यांना द्यावा लागणार आहे. पण हा हिशेब मी किंवा जनता नव्हे तर सीबीआय घेणार आहे. कुणालाच सोडले जाणार नाही. तृणमूलने ज्याप्रकारे 10 वर्षांमध्ये बंगालच्या जनतेवर अत्याचार केले आहेत, कटमनी सिंडिकेटद्वारे लूट चालविली आहे, त्या सर्वांचा हिशेब 2 मे नंतर द्यावा लागणार असल्याचे चटर्जी म्हणाल्या.
अवैध स्वरुपात कोळसा उत्खनन, वाळूउपसा, दगड उत्खनन, सिंडिकेटराज चालविणाऱयांचे आता खरे नाही. सरकारी योजनांकरता ज्या लोकांनी कटमनी घेतला आहे, त्यांना सोडले जाणार नाही. जनतेच्या पै अन् पैंचा हिशेब होणार असल्याचे म्हणत चटर्जी यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे.