रेल्वे सरव्यवस्थापक संजीव किशोर : कर्मचाऱयांना केले मार्गदर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वे चालविताना अनेक अपघात डोळय़ांसमोर दिसत असतात. बऱयाचवेळी ते दिसूनही चालकाला काहीच करता येत नाही. तर काहीवेळा क्षणाधार्थ निर्णय घ्यावा लागतो. अशावेळी लोको पायलटने आत्मविश्वासाने निर्णय घ्यावा, अशी सूचना नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव किशोर यांनी केले.
हुबळी येथील डिझेल लोको शेडच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरव्यवस्थापकांनी नैर्त्रुत्य रेल्वेतील लोको पायलटना मार्गदर्शन केले. रेल्वे चालविताना सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. नैर्त्रुत्य रेल्वे सर्व लोको पायलटना सर्व सेवा-सुविधा देत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला लोको पायलटसह साहाय्यक लोको पायलट, लोको इन्स्पेक्टर उपस्थित होते. संजीव किशोर यांनी नैर्त्रुत्य रेल्वेच्या कर्मचाऱयांचे कौतुक करत कोरोना काळातही प्रवासी व माल वाहतूक सुरू ठेवत महसुलात वाढ केल्याबद्दल कौतुक केले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी कर्मचाऱयांना सिग्नलविषयी माहिती दिली. यावेळी मुख्य इलेक्ट्रिकल इंजिनिअर जयपाल सिंग, मुख्य मेकॅनिकल इंजिनिअर आर. पी. मीना यांच्यासह नैर्त्रुत्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.