आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांचे स्पष्टीकरण- कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी नियम जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेले कठोर नियम बदलण्याचा प्रश्नच नाही. चित्रपटगृहांच्या नियमांसह कोणतेही नियम सध्या शिथील केले जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिले आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री सरकारने जारी केलेले कठोर नियम पुढील आदेशापर्यंत जैसे थेच राहण्याची शक्यता आहे.
बेंगळूर येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. सुधाकर म्हणाले, राज्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काही दिवसांकरिता कठोर नियम जारी केले आहेत. कोणतीही मार्गसूची अचानक जारी केलेली नाही याची सर्वांनी दखल घ्यावी. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी मार्गसूची जारी करण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमांचे सर्वांनीच पालन केलेच पाहिजे.
कोविड तांत्रिक सल्लागार समितीने कोरोनाची दुसरी लाट राज्यात आणखी दोन महिने राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी तोलून मापून मार्गसूची जारी केली आहे. राज्यातील 8 जिल्हय़ांमध्ये कठोर नियम जारी केले आहेत. बेंगळूर शहर, धारवाडसह आठ जिल्हय़ामंध्ये चित्रपटगृहांमध्ये 50 टक्के आसनांवर प्रेक्षकांना प्रवेश देण्याची अट घालण्यात आली आहे. हा नियम बदलण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.
कोरोनाची परिस्थिती भविष्यात हाताबाहेर जाऊ नये यासाठी कोविड तांत्रिक सल्लागार समितीने इशारा दिला आहे. त्यामुळेच चित्रपटगृहांसाठी नियमावली जारी करणे अनिवार्य आहे. शिवाय जीम, स्विमिंग पूल बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. हा निर्णय बदलणे शक्य नाही, असा पुनरुच्चार डॉ. सुधाकर यांनी केला आहे. .
चित्रपटगृहांना 50 टक्केचा नियम 7 एप्रिलनंतर लागू
राज्य सरकारने कठोर नियम जारी करताना आठ जिल्हय़ांमधील चित्रपटगृहांमध्ये आसनक्षमतेच्या 50 टक्के पेक्षकांना प्रवेश देण्याची अट घातली होती. मात्र, शनिवारी कन्नड चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी नाराजी व्यक्त केल्याने आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेतल्याने सरकारने नियमात किंचित बदल केला आहे. चित्रपटांसाठी आगाऊ बुकींग करण्यात आल्याने सरकारने 7 एप्रिलनंतर 50 टक्के प्रेक्षक प्रवेशाची अट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 7 एप्रिलपर्यंत आठ जिल्हय़ांमधील चित्रपटगृहांना 100 टक्के आसन भरतीची मुभा देण्यात आली आहे.