गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकार घेणार अंतिम निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाबरोबरच ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्णही वाढत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर निर्बंध लागू करावेत का, यासंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंगळवारी सायंकाळी कोविड टास्कफोर्सची बैठक बोलावली आहे. तज्ञांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी होणाऱया मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोम्माई यांनी सांगितले आहे.
बेंगळूरमधील आर. टी. नगर येथील शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यातील कोरोना आणि ओमिक्रॉन फैलावाकडे लक्ष ठेवण्यात आले आहे. संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मंगळवारी सायंकाळी 6ः30 वाजता तज्ञांची बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीत तज्ञांकडून कोणते सल्ले देण्यात येतात, याबाबत गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून कठोर निर्णय घेतला जाणार आहे, असे ते म्हणाले.
शेजारील राज्यांमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे तज्ञांची तातडीने बैठक घेणे जरुरीचे आहे. राज्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेचा सामना केलेला असल्यामुळे पुढील परिस्थिती योग्य रितीने हाताळून जनजीवनाला धक्का पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन जारी करावा की सेमी लॉकडाऊन?, कोणत्या पद्धतीने निर्बंध घालावेत याविषयी मंत्रिमंडळातील सहकाऱयांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे बोम्माई यांनी सांगितले.