प्रतिनिधी / कोल्हापूर
महारयत ऍग्रो इंडीया लि.इस्लामपूर या कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनामध्ये केलेल्या घोटाळ्यामुळे शेकडो कुटूंबांवर मोठा अन्याय झाला आहे. या घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधारांना अटक करून या कुटूंबांना न्याय द्यावा,या मागणीचे निवेदन कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीच्यावतीने मंत्री बच्चू कडू यांना सांगली जिह्यातील विटा येथे दिले. याची गांभिर्याने दखल घेत या प्रकरणातील पडद्याआडच्या सुत्रधारास लवकरच जेरबंद करून कडकनाथ कोंबडी पालन करणाऱया कुटूंबांना न्याय देऊ अशी ग्वाही मंत्री बच्चू कडू यांनी दिली.
प्रहार संघटनेच्यावतीने विटा येथे मंत्री बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमप्रसंगी ‘कडकनाथ’ संघर्ष समिती मंत्री बच्चू कडू यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली. या घोटाळ्यास पाच महिने झाले तरीही संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समितीने सांगितले. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्षम अधिकारी नियुक्त करून जलद गतीने तपास करण्याची मागणी केली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून त्वरीत कारवाई करण्याचे आश्वासन मंत्री बच्चू कडू यांनी दिले. तसेच मुंबई येथे 22 जानेवारी रोजी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिह्यातील संबंधित तपास अधिकाऱयांसोबत बैठक घेण्याबाबत त्यांनी सचिवांना सूचना दिल्या.
यावेळी कोल्हापूरचे विजय आमते, अमृत शिंत्रे, बबन मुल्लाणी, उत्तम कदम, उत्तम पाटील, कैलास पाटील, संजय पाटील, सुभाष माळवी, सातारामधून सचिन शिर्के, विष्णू मोरे, योगेश घोडके, सांगलीतील प्रमोद यादव यांच्यासह संघर्ष समितीमधील शेतकरी बांधव उपस्थित होते.