प्रतिनिधी / वारणानगर
कोल्हापुरामधील तालुका पन्हाळ्यातील मसुदमाले येथील प्रमोद सर्जेराव जमदाडे वय अंदाजे २९ यांनी कडकनाथ कोंबडी पालनासाठी काढलेल्या कर्जाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केली असून राज्यात गाजलेल्या कडकनाथ घोटाळ्यातील पहिला बळी पन्हाळा तालुक्यात गेला आहे. प्रमोद याने कडकनाथ कोंबडी व्यवसायासाठी लाखो रुपये कर्ज व सावकारी कर्ज स्वरूपात काढलेले होते सदर व्यवसायात फसवणूक झाल्याने काढलेले कर्ज कशाने परत करायचे हा मोठा त्याच्या पुढे प्रश्न होता यातून सावरणेसाठी त्याने शेळी पालन व्यवसायही सुरू केला होता. तथापि कडकनाथ कोंबडी व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी सावकार, बँक यांचा तगादा पाठीमागे लागल्यामुळे एक तरुण होतकरू युवक प्रमोद जमदाडे याने ४ दिवसापूर्वी विषप्राशन करूनआत्महत्येचा मार्ग स्वीकारला. गेली ४ दिवस मृत्यूशी झुंज देत आज मंगळवार दि. २१ रोजी सकाळी त्यांची उपचारा दरम्याम प्राणजोत मावळली.
राजकीय वरदहस्ताने हतबलता कडकनाथ किती बळी घेणार ……
कडकनाथ कोंबडी व्यवसायात शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये वारणा परिसरातील तरुणांची देखील फसवणूक झाली असून यामध्ये प्रमोद जमदाडे याचा देखील समावेश आहे. यासंदर्भात पोलीसात त्याने गुन्हा देखील फसवणूक केलेल्या कंपनीविरूध्द दाखल केला आहे. या संदर्भाने आर्थिक गुन्हा अन्वेषन शाखेकडे सर्व पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे वर्ग केले आहेत. दाखल गुन्ह्याला राजकीय वरदहस्तामुळे तपासाला पुढे गतीच मिळत नसल्याने फसवणूक झालेले तरूण सैरभैर झाले असून पोलीसाकडून कारवाईच ठोस होत नसल्याने गुंतवणूकदार हतबल झाले आहेत त्यामुळे कडकनाथ आणखी किती बळी घेणार याची चर्चा सुरू झाली आहे.
प्रमोदच्या निधनामुळे माले गांवात शोककळा पसरली आहे कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती, कोल्हापूर यांचे वतीनेही शोक व्यक्त करण्यात आला आहे.