ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात आजही 15 हजार पेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचीही कडक अंमलबजावणी केली जात आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लावण्याची भीती सगळ्यांनाच सतावतेय, त्यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी आर्ज चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे. लॉकडाऊन करून सगळे बंद करणे आम्हालाही नको आहे. त्यामुळे सर्वांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्यामुळे आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना दिला आहे.
पुढे ते म्हणाले, गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरू केले आणि त्यानंतर सुमारे 4 महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला. पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल आणि उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
गेल्या 4 महिन्यात सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखे सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरू झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.