मुंबई / ऑनलाईन टीम
कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहे. निर्बंध असतानाही दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील राज्यात कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे म्हटले आहे. एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आज मंत्रीमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत आपण १० ते १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितले. आज ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांची जितक्या प्रमाणात गरज आहे तितकी उपलब्धता नाही. आता विशाखापट्टणम वैगेरे येथून ऑक्सिजन आणावा लागत आहे. मला वाटतं जर १० ते १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन केला तर इतर सगळ्या गोष्टी, साधनसामुग्री एकत्र करण्यास वेळ मिळेल. तसंच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपयोग होईल. साखळी तोडणं आणि सुविधा वाढवून लोकांना वाचवणं या दोन मार्गांनी काम करण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की, सहा ते आठ महिन्यांचा लॉकडाऊन नको पण १५ दिवसांसाठी लॉकडाऊन केला तर बरं होईल. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असून आज पुन्हा एकदा त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितलं.
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.